Friday 26 December 2014

माझ्या आयुष्यात आलेली एक सुंदर परी .. आश्लेषा


भाग २ : राग

आश्लेषाला जेंव्हा इतरांचा राग यायचा तेंव्हा त्यांच्या तक्रारी करायची एकमेव हक्काची जागा होती .... तिचा "म्याव". मग ती तक्रार कधी तिच्या आईची असायची तर कधी तिच्या आजी आजोबांची, वडिलांची ... आणि मग ती पक्के ठरवून माझ्याकडे यायची. "मी तिच्याशी बोलनार नाई. तू पण बोलू नको."
एकदा तर काही तरी कारणाने तिला घराचे कोणीतरी ओरडले. ती सरळ आमच्या घरी आली आणि रडत रडत म्हणाली, " मी आता त्यांच्या घरी जानार नाई. ते लोक मला ओरडतात."
"अग, पण ते तुझेसुद्धा घर आहे न?"
"नाई. आता ते माझ घर नाई."
"मग तुझ घर कुठल?"
डोळे पुसत आमच्या घराकडे बोट दाखवून म्हणाली, "हे माझ घर आहे."
"अग, पण तुझा ड्याडी तर त्या घरी राहतो ना? मग तू इथे ड्याडी शिवाय राहणार का?" ती रडणे थांबवून विचारात पडली. सिद्धेशवर तिचे अतोनात प्रेम ... काय करायचे प्रश्न पडला.
परत रडवेल्या सुरात म्हणाली "तू त्याला पण इथे राहायला सांग."
"अग, पण तिथे त्याचे आई बाबा राहतात ना? मग तो त्यांना सोडून इथे कसा राहील? तुला कसा तुझा ड्याडी पाहिजे तसा तो तर त्याच्या ड्याडीबरोबर राहणार ना?" आता रडणे पूर्ण थांबले. प्रश्न काही सुटत नव्हता. विचार चालू होता. "मग ते मला ओरडले तसं तू पण त्यांना ओरड. मग मी जाईन त्यांच्याकडे."
"मी त्यांना ओरडलो आणि ते मला म्हणाले की .... "आम्हाला ओरडणार तर तू आमच्या घरी येऊ नको" ..... तर मग आपण कसे भेटणार आणि खेळणार."
आता हा मोठा लफडा झाला. रडणे पूर्ण थांबले. पण माघार कशी घ्यायची? "मग मी ड्याडी ला सांगेन त्यांना ओरडायला." प्रश्न मिटला. संध्याकाळी सिद्धेश येईपर्यंत मुक्काम आमच्या घरी _!

आमच्या वरच्या मजल्यावर तिची आत्या राहते. एकदा आश्लेषाचा आणि तिचा काही कारणावरून वाद झाला. आणि ती आश्लेषाला खोट खोट म्हणाली. " मग तू आमच्याकडे येऊ नकोस. जा तुझ्या म्यावकडे."
आश्लेषा खाली आली आणि मला पाहिल्यावर रडायला लागली. मी विचारले "काय झाले?" "निमा आत्या म्हणाली तू आमच्याकडे येऊ नको. म्यावकडे जा. मी आता त्यांच्याकडे कदीच नाई जानार."
"मग तू तिला सांगितलास का की तू तिच्याकडे कधीच जाणार नाहीस ते?"
"मी नाई सांगनार. तूच सांग तिला. मी तिच्याशी बोलनार पन नाई."
"तू बोलली नाही तर तिला कसे कळणार की तू तिच्याशी बोलत नाहीस आणि घरी पण येत नाहीस." रडणे थांबले. थोडा विचार केला आणि ती आमच्या घरातून गेली. दोन मिनिटात परत आली आणि म्हणाली, "मी सांगितलं तिला की मी तुज्याशी बोलनार नाई आनी त्यांच्या घरी पण जानार नाई."
"मग तू प्रनु दीदी आणि चैतू दीदीशी (तिच्या आते बहिणी) कशी खेळणार?" विचार करून ती म्हणाली, "मी नाई त्यांच्याशी खेलनार. मी तुज्याशी खेलनार."
"पण त्यांनी खेळायला बोलावले तर?"
ही परत वर जाऊन आली. "मी निमा आत्याला सांगितलं की प्रनु दीदी आणि चैतू दीदी नि खेलायला बोलावलं तरी मी येणार नाई." "आणि त्यांच्याकडे चिकन केले कि ते तुला खायला बोलावणार. मग तू काय करणार? मग तर तुला जावेच लागणार."
चिकन प्राणप्रिया .. पण यावेळेला अपमान जर जास्तच झोम्बालेला .. परत वरची एक फेरी झाली आणि येउन म्हणाली, " मी तिला सांगितला की चिकन खायला बोलावलं तरी मी येणार नाई." मी विचारले की "चिकन तर तुला आवडते ना? मग ते खायला का जात नाहीस?"
ती म्हणाली, " मग ती तुज्या म्याव कडे जा म्हणाली ना. मग मला नको त्यांचे चिकन. तू मला चिकन देशील?" अच्छा .. म्हणजे म्याव चे नाव भांडणात का घेतले? हा खरा मुद्दा होता.
काही दिवसांनी ती परत निमाच्या घरी जायला लागली. एक दिवस मी विचारले. "काय ग, निमा आत्याशी भांडण झालेले ना? मग तिच्या घरी आता कशी गेलीस?"
"कारण का तिने मला चिकन खायला बोलावलेलं ना?. मग ते चिकन उरणार ना? म्हणून मी खायला गेली."
"पण तू तिला सांगितलेलं ना की मी चिकन खायला बोलावलं तरी येणार नाही." थोडा विचार करून मग मला वेड्यात काढत ती म्हणाली, "अर्रे, कारण का ती त्या दिवशी बोल्ली ना की येऊ नको म्हणून. आज नाई बोल्ली ना. म्हणून मी आज गेली. त्या दिवशी कुठे गेली मी तिच्याकडे?" What a logic ???



Sunday 30 November 2014

माझ्या आयुष्यात आलेली एक सुंदर परी .. आश्लेषा


भाग १ : लपंडाव


"ए म्याव ... मी किचनमध्ये लपनार. तू मला हॉलमध्ये आणि बेदलुममध्ये शोधायचं हां."
"ए म्याव ... आपन आओ मीना खेलू या का?"
"ए म्याव ... सांग ना ... मी पानाला कोन्ता कलर देऊ?"
"ए म्याव ... तू आमच्याकडे कधी ऱ्हायला येनार?"

आज अशी अनेक वाक्ये आठवत आहेत. भोवताली पुष्कळ प्रसंग फेर धरून नाचत आहेत आणि कानात तिचे गोड शब्द "ए म्याव ... ए म्याव ..." गुंजन करत आहेत. एकेका शब्दाचा उच्चार विचारपूर्वक, स्पष्टपणे आणि अत्यंत धीमेपणाने करत बोलण्याची तिची शैली मनात रुतून बसली आहे. माझ्यावर असलेले तिचे निर्व्याज प्रेम मला आजही संभ्रमात टाकते. कुणास ठाऊक पण कोणत्यातरी पुर्वजन्माचा ऋणानुबंध घेऊन आश्लेषा जन्माला आली इतके नक्की! 

२००७ मधली गोष्ट आहे. मी आणि हरदत्तमामा एकाच इमारतीमध्ये राहत होतो. त्याचे घर पहिल्या मजल्यावर तर आमचे तिसऱ्या .... त्याचा मुलगा, सिद्धेश आणि माझा स्नेहसंबंध हा भावापेक्षा खूप वेगळ्या पातळीवरचा आहे. आमच्यामधला जिव्हाळा, प्रेम हे शब्दातीत आहे. आश्लेषा ... सिद्धेशची मुलगी ... जन्मली तेंव्हा सिद्धेश नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये रहात होता. आश्लेषा .... तिची आई आणि आजी-आजोबा-आत्या यांच्यासह राहत होती. रोज कामावरून घरी परत येताना पहिले त्यांच्या घरी जाऊन आश्लेषासोबत थोडा वेळ घालवून मग जेवायला घरी येत असे. जेवण झाल्यावर परत खाली जाऊन तिच्याबरोबर खेळण्यात माझा वेळ कसा जाई काही कळत नसे. ती झोपली की मी घरी परतत असे. तान्हे बाळ होती ती ... तेंव्हा इतर लहान मुलांप्रमाणे गुदगुल्या करणे, डोके अंगावर घासणे असे प्रकार केले की तीसुद्धा सर्वांना प्रतिसाद देत असे. पण आमचा खेळ वेगळाच चाले. ती ज्या बेडवर असे त्याच्या कोणत्यातरी बाजूला खाली लपून मी मांजराचा आवाज करत असे आणि ती तो आवाज शोधण्याचा प्रयत्न करत असे. त्या दिशेला कुशीवर वळण्याचा प्रयत्न करत असे. आणि मी दिसलो की खुदकन हसत असे. तिला मांजरांचा आवाज करणारी बरीच खेळणी मी आणून दिली होती. ती जशी मोठी झाली तशी मग माझी ओळख "म्याव काका" अशीच झाली. आणि मग तिच्याबरोबर खेळता खेळता मी तिचा काका न राहता तिच्या वयाचा मित्र झालो आणि काका गळून नुसता "म्याव" राहिला. 

ती थोडीशी मोठी झाली तसा आमचा लपंडाव खऱ्या अर्थाने रंगू लागला. मी लपलो की ती घरभर शोधत असे आणि नाही सापडलो की अस्वस्थ होऊन मग रडवा चेहरा करून "म्याव तू कुठे आहे?" असे ओरडत फिरत असे. घरातले कुणीतरी मग तिला हळूच कानात मी लपलेली जागा सांगत असे. मग मी सापडलो की तिचे वाक्य ठरलेले असे. "म्याव असे नाही करायचे हा. तू मी सांगते तिथे लपायचे." मग माझी लपायची जागा ती सांगायची. इकडे तिकडे शोधण्याचे नाटक करून मला एकदम अचूक हुडकून काढायची आणि एकदम खुश होऊन जायची. 

तिची लपण्याची पाळी आली की आणखीन मजा यायची. ती सरळ जाहीर करायची, "ए म्याव ... मी किचनमध्ये लपनार. तू मला हॉलमध्ये आणि बेदलुममध्ये शोधायचं हां. मग मी नाही सापडली की तू मला हाक मारायची. मग मी तुला सांगेन .... मी किचन मधे आहे मग तू मला किचन मधे शोधायचं. पण मला आउट नाही करायचं हा. मग तू हरलास की मी बाहेर येणार. OK?" मग ती लपायची ठरल्याप्रमाणे सगळे पार पडायचे आणि ती जिंकायची.

कधी कधी मी थेट ती लपलेल्या जागी जाऊन तिला आउट केले की मग रुसून बसायची, " म्याव ... तू चीटिंग करतो. तू पयले मला बेदलुममधे आणि किचनमधे शोधल नाही." मग परत माझ्यावर डाव येत असे आणि तिला हाक मारत घरभर फिरावे लागत असे.

कधी कधी मी मुद्दाम हॉलमध्ये टाईम पास करायचो. मग ती किचनमधून हळूच बाहेर यायची आणि मी दिसलो की म्हणायची, "ए म्याव, मला बेदलुममधे शोध ना."

कधी मी बराच वेळ मुद्दामच तिला हाक मारत नसे. मग ती बेडरूममधून ओरडून सांगायची, "ए म्याव, मी बेदलुममधे कपटामागे लपलीय का विचार ना?" किंवा "ए म्याव, मी बेदलुममधे खिडकीत लपलीय का विचार ना?"

या साऱ्या लपंडावामधे तिचा हा असा निरागसपणा खूप उठून दिसत असे. आजही तिची निरागसता तशीच टिकून आहे. ही निरागसता हा तिचा स्थायी स्वभाव आहे.


------X------O------X------



Sunday 2 November 2014

तुम्हे हो ना हो_ मुझ को तो _ इतना यकीन है



चित्रपट : "घरोंदा"         गाणे : तुम्हे हो ना हो, मुझ को तो इतना यकीन है
Dear Friends, या गाण्याचे पहिले कडवे ऐकताना मला जे जाणवले ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

मुझे प्या ssss र .... तुम से ....  नहीं है .... नहीं है
मगर मैंने ये राज अब तक ना जाना
के क्यों .... प्यारी लगती है, बातें तुम्हारी
मैं क्यों तुम से मिलने का ढूँढू बहाना

पहिल्या दोन ओळी आणि नंतरच्या दोन ओळी .. ऐकायला similar वाटत असल्या तरी तशा त्या नाहीत. पहिल्या दोन ओळी ज्या स्वरात आहेत त्यापेक्षा किंचित वरचा स्वर पुढच्या दोन ओळीत आहे. पहिली आणि तिसरी ओळ यातदेखील tune मध्ये सूक्ष्म फरक आहे. पहिल्या ओळीत "प्यार" शब्दातला आलाप अंगावर मोरपीस फिरवून जातो. या ओळीत नंतर तीन pause आहेत. तिसऱ्या ओळीत "के क्यो .... प्यारी लगती” असा एकच pause आहे. बाकीची ओळ मनात शिरते ती roller coaster सारखी वर खाली लाडीक आंदोलने घेतच!

"मुझे प्यार .. तुम से ..  नहीं है .. नहीं है” या ओळीत “नही है" या शब्दांचा उच्चार करताना "नही" मधल्या "ही" वर जोर देत त्याचा किंचित ठळक उच्चार करत खेचलाय आणि "है" हा मुलायमपणे सोडलाय. एखादी गोष्ट कशी आहे ते समजूनदेखील जेंव्हा ती स्वीकारायला मन नकार देते तेंव्हा ते असेच वागते नाही का?

"मगर मैंने ये राज अब तक ना जाना" ही ओळ खरे तर नंतरच्या ओळींशी संबंधित आहे. या ओळीनंतर घेतलेला किंचित pause हा ती ओळ आधीच्या "मुझे प्यार तुम से नहीं है, नहीं है" या ओळीला जोडून आल्यासारखी वाटते. आणि मनाची द्विधा अवस्था परत एकदा घट्ट होते. "मगर मैंने ___" ही ओळ अशी वर आणि खाली दोन्ही ठिकाणी जोडली गेल्यामुळे ऐकताना होणारा परिणाम एखाद्या suspense film सारखा होतो.

पहिल्या आणि तिसऱ्या ओळींच्या शेवटी येणारे "जाना" आणि "बहाना" हे शब्द रुना लैलांनी असे उच्चारलेत की ते ऐकणेबलच आहेत. "जाना" हा असा अलगद सोडलाय .. जणू हवेवर तरंगत येणारे पीस आहे आणि "बहाना" शब्द हा लाटांवर वाहात असल्यासारखा मनात तरंग उठवतो आणि आपण जणू उंचावलेल्या लाटेवर स्वार झालोत असे feeling देतो.

कभी मैंने चाहा, तुम्हे छू के देखू
कभी मैंने चाहा, तुम्हे पास लाना
मगर फिर भी
मगर फिर भी इस बात का तो यकीन है
मुझे प्यार तुम से नहीं है, नहीं है

प्रेमात भिजलेले मन जेंव्हा स्वप्न बघते तेंव्हा ते उंच आभाळात झेप घेते. पण खात्री नसलेले मन लगेच जमिनीवर उतरते. तसेच "बहाना" नंतरचे शब्द "कभी मैंने चाहा" एकदम उंच झेप घेतात आणि "तुम्हे छू के देखू" _ "कभी मैंने चाहा" _ "तुम्हे पास लाना" अशा गिरक्या घेत घेत खाली उतरतात. "मगर फिर भी" ला पूर्ण खाली पोचतात आणि मनाला परत शंकांच्या घेऱ्यात उतरवतात. शंकेला दृढता देण्यासाठी "मगर फिर भी" हेच शब्द परत किंचित वरच्या दिशेने स्वरांवर स्वार होतात आणि "मुझे प्यार तुम से नहीं है, नहीं है" या ओळीवर येऊन स्थिरावतात.

ता. क.

"मगर फिर भी इस बात का तो यकीन है" ही ओळ मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा तेंव्हा ही pure कविता असल्याची माझी खात्री पटते. या ओळीतला "तो" शब्द मीटरमध्ये बसवण्यासाठी संगीतकाराला बरीच कसरत करावी लागली असावी असा माझा कयास आहे. हा शब्द काढला असता तर ओळ मीटरमध्ये perfect बसली असती. पण "तो" या शब्दामुळे “यकीन” शब्दाला दृढता मिळते. त्यामुळे हा शब्द अपरिहार्य आहे असे माझे मत आहे. म्हणूनच संगीतकार जयदेव यांना सलाम!


Sunday 26 October 2014

तुम्हे हो ना हो _ मुझ को तो _ इतना यकीन है


चित्रपट : "घरोंदा"         गाणे : तुम्हे हो ना हो, मुझ  को तो इतना यकीन है
Dear Friends, हे गाणे वाचताना आणि ऐकताना मला जे जाणवले ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

माझे मन तुझ्याकडे ओढ घेते आहे पण मला ते प्रेम आहे याची खात्री नाही. नव्हे नव्हे ... ते प्रेम नाहीच याची मला खात्री आहे. तरी ही माझ्या मनात हे असे का घडतेय? या संभ्रमित अवस्थेचे यथार्थ वर्णन गुलझारजीनी या कवितेमध्ये केले आहे. वाचल्यावर मला तरी ही सरळसोट कविता आणि फक्त कविताच वाटते आणि कविता म्हणूनच मनाला भावते. पण जयदेवजींचा स्पर्श होताच सुरेल गाणे बनून आपल्यापुढे येते.

आपण कोणाच्याही घरी जातो तेंव्हा प्रथम त्यांच्या घराची बेल वाजवतो. हे गाणे सुरु होतानाच "तुम्हे हो ना हो" या शब्दांनंतर आणि "मुझ को तो" नंतर एक मोठ्ठा pause (मोकळा अवकाश) सोडलाय आणि त्यामध्ये नेमका या "बेल" चा आवाज  टाकला आहे (नीट ऐका _ तो "डिंग डॉँग" सदृश Violin स्वर). ऐकणारा लगेच काळीज उघडून गाण्याकडे पाहू लागतो. 

गाणे सुरु होताच कवितेमधले "नही है नही है" असे थेट अर्थाचे शब्द  ..  जयदेवजींनी त्यामधे देखील किंचितसा pause सोडून  एकदम सुंदर परिणाम साधलाय. प्यार "नही है" की " है" ही अस्पष्टता, तिच्या मनातला हा संभ्रम लगेच आपल्यापर्यंत पोहोचवून जातात. नीट ऐकले की लक्षात येते   .."मुझे प्यार तुमसे नही है नही  ____ है" असे शब्द कानावर पडतात. पहिल्याच ओळीत pause नंतर येणारा "है" शब्द आलापांमध्ये असा हेलकावत येतो की "नही है" चा परिणाम पुसला जाऊन "है" चा परिणाम शिल्लक राहतो आणि आपली खात्री पटते " मुझे प्यार तुमसे है". पण ..... दुसऱ्या ओळीमध्ये pause नंतर येणारा "है" .... हा खिळ्यावर हातोडा ठोकल्यासारखा येतो आणि लगेच थांबतो. आपण पुन्हा संभ्रमात ... की  नक्की "है"? का "नही है"? 

दोन्ही ओळीत येणारा "प्यार" हा शब्द नीट ऐकला तर लक्षात येते की पहिल्या ओळीत साधा सरळ आणि सौम्य गोड असणारा "प्यार" असा उच्चार दुसऱ्या ओळीत (प्या sss र) झोपाळ्यावर वर खाली हिंदोळल्यासारखा आलाय आणि त्यामुळे लडिवाळपणे आपल्या मनाला बिलगून जातो.

गाणे खूप जुने आहे. आताच्या पिढीतील किती जणांनी ऐकले आहे? त्यांना हे बारकावे जाणवले आहेत का? किंबहुना असे बारकावे असतात याची त्यांना कल्पना आहे का? आणि असे बारकावे आपले मित्र, नातेवाईक अशा सारख्यांपर्यंत पोहोचावे असे आपल्याला वाटते का? आपण ते पोहोचवतो का?  माहिती नाही. मला हे आपल्यापर्यंत पोहोचवावे असे वाटले, मी लिहिले. सर्व गाणे बारकाव्यांसहित लिहायचे तर तुम्हाला कितपत आवडेल? आज काल वाचायला इतका वेळ आहे का कोणाकडे ? म्हणूनच मी फक्त गाण्याच्या सुरुवातीबद्दल लिहिलेय. आणि ते सुद्धा मला जाणवलेले एक दोन बारकावे _! तुम्ही या गाण्यात असेच काही बारकावे अनुभवले असतील तर जरूर लिहा.

तुम्हे हो ना हो, मुझ  को तो __ इतना यकीन है
मुझे प्यार ___ तुम से ___ नहीं है नहीं __  है



Thursday 11 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग शेवटचा




जानेवारी १९९८ - हिमालयाचे आमंत्रण


जानेवारीचा पहिलाच आठवडा _ मी घरात दिवाणखान्यात सोफ़ावर डोळे बंद करून बसलो होतो. समोर एक धिप्पाड आकृती दिसू लागली. भगवी छाटी नेसलेला एक नाथपंथी डोळ्यांसमोर अवतीर्ण झाला. मनात शब्द उमटले "जालंदरनाथ"! भरदार देहयष्टी, दाढीमिश्यांनी भरलेला भारदस्त तेजःपुंज चेहरा _ 
गळ्यात, हातात रुद्राक्षमाळा _ शब्द उमटले "चल, आता तुझे इथे काय काम? इथले काम संपले. चल आता हिमालयात _".

माझ्या नजरेत पाणी तरळले. ज्या आमंत्रणाची वाट साधक जन्मोन्जन्म करतो, ते आमंत्रण इतक्या सहजपणे पदरात पडले? नजरेसमोर आई-बाबा आले. मी उत्तरलो, "आज मी घर सोडलं तर हे घर कोलमडून पडेल. या घरात कमावता मी एकटाच आहे. डोक्यावर कर्ज आहे. आईबाबांचं पुढच आयुष्य कस जाईल? मी मुक्त आहे, हे मी जाणतो. कारण मी कर्ता करविता नाही. 
जो कर्ता करविता आहे तोच आई बाबांची काळजी करेल आणि घेईल. पण लौकिक जगात तुमच्या मुलाचा बदलौकिक होईल. लोकांनी मला नावे ठेवली तर चालेल पण तुमच्या भक्तीची फळे माझ्या आईबाबांच्या त्रासात नसावी. अन्यथा लोकांना वाटेल, तुमची भक्ती करणाऱ्याचे आई-वडील असेच वाऱ्यावर सोडले जातात. लोकांनी भक्ती, श्रद्धा, विश्वास यांना नावं ठेवलेली मला नकोत. ते इथे वळावेत ही माझी इच्छा आहे. याउपर आपली आज्ञा असेल त्याप्रमाणे मी करेन."

डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. नाथांचा चेहरा समाधानाने हसला. माझ्या पाठीवरून डावा हात फिरवला. "तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तथास्तु!" 
उजवा हात आशिर्वाद देण्यासाठी उचलला.

डोळे उघडले तेंव्हा अविरत अश्रू झरत होते. माझे उत्तर योग्य की अयोग्य _ काळच ठरवेल.



समाप्त


Wednesday 10 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १८






१३ डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
समोर अद्भुत प्रकाश दिसू लागला. पांढरा शुभ्र आणि सोनेरी किरण मिश्रित _ !
एक कमळ समोर अवतीर्ण झाले. ते उमलताच त्यात ब्रह्मदेव बसलेले दिसले. 
ते प्रचंड आकाराचे कमळ व त्यात बसलेले ब्रह्मदेव  काही क्षणानंतर माझ्या दिशेने येऊ लागले. 
जसजसे ते अधिकाधिक जवळ येऊ लागले, आकार लहान होत गेला. थोड्या वेळाने लक्षात आले कि त्याचा रोख माझ्या छातीच्या दिशेने होता. हलकेच ते लहान होऊन माझ्या छातीत डाव्या बाजूला शिरले व हृदयात विराजमान झाले. 

१४ डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
समोर अद्भुत प्रकाश दिसू लागला. पांढरा शुभ्र, सोनेरी किरण आणि निळसर छटा _ !
त्यात दोन आकृत्या अवतीर्ण झाल्या. एक पुरुष एक स्त्री _
दुरून अस्पष्ट दिसत होत्या. पण रेखीव होत्या. 
त्या एकमेकांच्य दिशेने हलकेच सरकल्या _ तरंगत तरंगत एकमेकात मिसळल्या. आता समोर एकाच आकृती होती; अर्धा पुरुष अर्धी स्त्री  ... डावा भाग स्त्री ... उजवा भाग पुरुष _
आता परत ते वेगळे होऊ लागले. थोड्या अंतरावर जाऊन थांबले. काही क्षणानंतर परत एकत्र झाले आणि शब्द कानावर पडले "अर्धनारीनटेश्वर"! आता आकृती स्पष्ट दिसत होती, विष्णू आणि लक्ष्मी _
एकूण तीन वेळा ते दूर जाऊन पुन्हा अर्धनारीनटेश्वर या रुपात दिसले. तिसऱ्यांदा एकत्र झाल्यावर हलकेच माझ्या दिशेने येऊ लागले. लहान लहान होत माझ्या हृदयात विलीन झाले. 

 डिसेंबर  ..... 

ध्यानाला बसल्यावर ...
मी जिथे बसलो होतो त्या बैठकीच्या खाली सपाट जमीन होती. पण मला वेगळंच दिसू लागले. मला दिसले कि मी एका प्रचंड मोठ्या शिळेवर बसलो आहे. माझ्या कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेलं  आहे. मला पाठीमागे आणखीन दोन हात आहेत. एका हातात डमरू आहे. उजवीकडे त्या शिळेत खोवून एक त्रिशूल उभा आहे. मागच्या डाव्या हातात शंख आहे. गळ्यात एक जाडजूड साप/ नाग आहे. डोक्यावर जटा बांधल्या आहेत. संपूर्ण शरीरावर भस्म लावलेलं आहे. त्याचे पट्टे आहेत. जटामधुन पाण्याची एक धार निघाल्याची जाणीव आहे. पण पाणी दिसत नाहीय. कपाळावर मधोमध तिसरा डोळा _ चारही बाजूनी उंच कातळ वरवर गेलेत.

सगळीकडे शांतता आहे. आजवर अनेक ठिकाणी शांतता अनुभवली पण कितीही शांत वातावरण असले तरी तिथे अत्यंत सूक्ष्म नाद ऐकू यायचाच. ही शांतता मात्र खऱ्या अर्थाने नीरव होती. सूक्ष्मातले सूक्ष्म, अगदी अणुवर अणु आपटल्याचादेखील नाद नाही.  वातावरण स्तब्ध _तिथे प्रकाश नाही पण तरीही काळोखही नाही. जणू काळ गोठून गेलाय _ श्वासोश्वासाचाही आवाज नाही _ श्वासही स्तब्ध _ बंद पडलाय ? की कधी चालूच झाला नव्हता? ना कसली जाणीव ना नेणीव _ शिळेवरून डावा पाय खाली सोडून _ उजवा पाय दुमडून मी ध्यानस्थ बसलेला _ पण ही अवस्था तरी अस्तित्वात आहे का इतकं सार गोठलेले _ किती काळ लोटला कुणास ठावूक _ कारण तिथे काळ नावाचं काही अस्तित्वही जाणवत नव्हत.

अचानक डमरुचा कडकडाट, तडतडाट सुरु झाला. शंखाचा नाद ऐकू आला. पुन्हा सार शांत _ मूळ स्थितीत _ आणि मग .... शब्द ऐकू आले _ ऐकू आले की सुरु झाले? ते शरीरात उत्पन्न होत होते की वातावरणात _ त्याचं उगमस्थान कुठे होत _ असं वाटत होत की सारीकडून ते शब्द उमटत आहेत. कणाकणात उमटत आहेत _ सारे कण एक बनलेत आणि  ..... ते जे काही एक आहे त्यात ते शब्द उमटत आहेत. किंबहुना ते जे काही एक आहे ते फक्त त्या शब्दांचा उमटणारा नाद आहे. 

अहं शिवं ... अहं शिवं ...अहं शिवं .... 

अनाहत उमटणारे ते शब्द फक्त अस्तित्वात आहेत. किंबहुना फक्त नाद _ 

अहंशिवंअहंशिवंअहंशिवंअहं .… 

दोन नाद _  अहं आणि शिवं _ आता एकत्र झालेत. 

शिवंअहंशिवंअहंशिवंअहंशिवं .… 

शब्द एकेमेकात विलीन होत चाललेत.

शिवोहंशिवोहंशिवोहंशिवोहं .… 

नाद बदलत चाललेत. 

सोहंसोहंसोहंसोहंसोहंसोहं ……………………………………………………………
………………………………………………… ………………………………. 





Tuesday 9 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १७



१९९७ नोव्हेंबर

ध्यानाला बसल्यावर ……


माथ्याच्या ऊर्ध्वभागी गोल कमळ फुलले  होते. कमळाच्या मधोमध _ की मस्तकाच्या मधोमध _ तांबडा पदार्थ _ जसा एखाद्या खदखदणाऱ्या ज्वालामुखीच्या मधोमध असणारा लाव्हारस _ तो द्रव आहे की घट्ट _ की लिबलिबीत  ? तांबूस पिवळा _ त्यावर अधांतरी एक प्रकाशाचा स्तंभ _ दुधी रंगाचा _ की पांढरा सफेद _ त्या स्तंभावरून उर्ध्व दिशेने माझा प्रवास सुरु _ एकदम मधोमध  …. अचूकपणे _ स्तंभाच्या भोवताली कडी/ चक्रे _ जशी शनि ग्रहाच्या भोवती असतात.

त्या चक्रात _ की वावटळीत _ अत्यंत वेगात गोल गोल फिरणारे धुलीकण _ त्याचबरोबर अनेक माणसे व योगी _ ते पथभ्रष्ट झालेत (मनात कोणीतरी सांगतंय) _ मोहात अडकलेली माणसे _ किंवा आणखी कशात तरी अडकलेली _ माझा प्रवास मधल्या प्रकाश स्तंभामधून सुरूच _ वर पुन्हा एक वावटळ _ आणखी लोक _ त्यात अडकलेल्या माणसात ओळखीचे चेहरे _ मातुल गृहीचे, पितृगृहीचे नातेवाईक _ मोठे मोठे योगी, साधक _ ज्यांच्या नावाची सध्या जगात चर्चा अहे. यांनी तर प्रचंड साधना केलीय. तरीही इथेच? _ प्रवास सुरुच _ मधेच या वावटळीच्या गोलामध्ये एक निळी प्रकाशशलाका सुरु होते. ती दोन तीन कड्यांमधून वर जाऊन कड्यांच्या बाहेर जाते आणि संपते _ काय आहे ? _ प्रवास सुरूच _ कडबोळ्याप्रमाणे गोल असणारी ही कडी त्यात बरोबर मध्ये काहीही नाही. तिथून माझा प्रवास सुरूच _ अखेर या साऱ्या कड्यांना पार करून मी बाहेर _! 
इथे काहीच नाहीय.




Monday 8 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १६




१९९७ - कोहं


आता ध्यानामध्ये मन अधिकाधिक एकाग्र होऊ लागले.

एक दिवस ध्यानाला बसलेला असताना समोर अक्कलकोट येथील स्वामींचे मंदिर दिसू लागले. निर्गुण पादुका जेथे आहेत ते अक्कलकोट येथील स्थान .... त्या स्थानाच्या डाव्या बाजूला असलेल्या जाळीच्या दरवाजापाशी मी उभा होतो. माझ्या समोरच्या जाळीच्या दरवाजामागे बायका, मुले आणि त्यांच्यामागे इतर लोकांची गर्दी होती. साधारण आरती झाल्यानंतरचे वातावरण होते. मी आणि माझ्यामागाचे (जे मला दिसत नव्हते पण जाणवत होते) तसेच समोरचे .. असे आम्ही सारे जण जाळीचे दरवाजे उघडण्याची वाट पहात होतो. माझ्या बाजूने असलेल्यांमध्ये मी रांगेत पहिला होतो. विचार करत होतो _ दरवाजा उघडला की जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे.

समोरचा दरवाजा उघडला. मनात म्हटले की "आता त्या बायका स्वामींचे दर्शन घेऊन माझ्या उजव्या बाजूच्या दरवाजाने बाहेर पडणार". त्या बायका आत आल्या, पण निर्गुण पादुकांकडे  न जाता माझ्या दिशेने आल्या. निर्गुण पादुकांच्या जागी काहीच नव्हते. ती जागा रिकामी होती. त्या बायका समोर येउन माझ्या पायावर डोके ठेऊन नमस्कार करून बाहेर पडू लागल्या. मला समाजत नव्हते की काय चालले आहे. मी मागे वळून पाहीले. माझ्यापाठीमागे अत्यंत तेजस्वी अशा संन्याशांची रांग उभी होती. ते सारे उजवा हात आशीर्वादपर उभा करून शांत उभे होते. तुळतुळीत गोटा_ भगवी छाटी/ कफनी _ दिव्य तेज _ माझे माझ्या हाताकडे लक्ष गेले. तोही आशीर्वाद देण्यासाठी उभा होता _ अगदी त्या संन्याशांप्रमाणेच _! कोण आहेत हे ? आणि त्याहीपेक्षा महत्वाचे की  ..... कोण आहे मी? कोहं ... कोहं ...कोहं ....कोहं ...




Sunday 7 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १५




१९९७ - नाथसंप्रदाय



आता ध्यानाला बसल्यावर मला मी धुनीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून चिमटा वाजवताना दिसू लागलो.

अंगावर कधी भगवी तर कधी काळी पायघोळ कफनी असे तर कधी रुद्राक्षांच्या माळा आणि नाथपंथी कफनी .... धुनीजवळ बसून कधी चिंतन करीत असे .... कधी ध्यानात मग्न झालेला असे .... तर कधी काही नामःस्मरण चाललेले असे.

मी एकटा कधीच नसे. त्या धुनिभोवती माझ्यासारखेच काही जण बसलेले असत. आमची एकाच प्रकारची साधना चाललेली असे. कधी गम्य तर कधी अगम्य भाषेत ते काही सांगत असत. आपण काय करतोय आणि ते कसे करावे हे मनात, शरीरात भरवले जात असे. 

कधी कधी समोरची व्यक्ती दिसताच मनात त्यांची नावे उमटत. ठळक आठवणारी नावे आणि शरीरयष्टी दोनच ... श्री मच्छीन्द्रनाथ आणि श्री जालन्दरनाथ ! तिसरी व्यक्ती बहुदा गोरक्षनाथ किंवा कानिफनाथ .. नक्की आठवत नाही. पण या व्यक्ती एकापेक्षा जास्त वेळा दिसल्या.

आता ध्यानामध्ये मन अधिकाधिक एकाग्र होऊ लागले.



Saturday 6 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १४


१९९७ - नामःस्मरण


याच काळात मी श्री तीर्थक्षेत्र पावस येथे पोचलो. परमहंस श्री स्वामी स्वरुपानंदांचे निवासस्थान _ स्वामी ज्या खाटेवर झोपत त्यासमोर बसलो होतो. स्वामी स्वरूपानंद हे नामःस्मरणाचे अंतिम टोक _ असा योगी होणे नाही. त्यांना विनंती केली की नामःस्मरणाबाबत काही शिकवावे. काही नवीन ज्ञान माझ्या पदरात टाकावे.

त्या काळापर्यंत नामःस्मरणाचे अनेक अद्भुत अनुभव गुरुकृपेने प्राप्त झाले होते. अंगावरची कातडी नाममय झालेली _ रक्तप्रवाहातून रक्ताऐवजी नाम वाहात आहे _ शरीराचा कण अन कण नाममय झालेला _ यासारखे नाना अनुभव घेतले होते. एक प्रकारचा अहंकार झाला होता _ नामाचे सारे प्रकार आत्मसात केले असल्याचा _ ! जिभेच्या टोकापासून सुरु होऊन मेंदूपर्यंत तसेच जिभेच्या टोकापासून हृदयापर्यंत, बेम्बीपर्यंत किंवा शरीराच्या खालच्या टोकापर्यंत त्याची तार कशी काम करते हे गुरुमाउलीने दाखवले होते. यापेक्षा आणखी काही शिल्लक असेल असे वाटत नव्हते. त्याबाबत किंचितही शंका मनात नव्हती. पण त्या दिवशीचा अनुभव आगळा-वेगळा होता.

मी प्रार्थना करताना डोळे मिटलेले होते. प्रार्थना संपताक्षणी जाणवले की ........ मी नाकातून जो श्वास घेतो आहे तो श्वास नसून नाम आहे. बाहेरच्या हवेतील नाम नाकातून आत शिरत होते व तसेच नाकातून बाहेर पडत होते. हवा नामाचा आकार धारण करून आत बाहेर करत होती. मी श्वास घेत नसून नाम घेत आहे याची जाणीव होत होती. हलके हलके लक्षात आले की हे कसे व कधी शक्य होते.

त्यादिवशी "मला नामःस्मरण कळते" या अहंकाराची शकले उडाली. किंबहुना "मला काही कळते" या अहंकाराची शकले उडाली.





Friday 5 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १३




१९९७ - वारकरी संप्रदाय


आता मला हाती  चिपळ्या धरल्याचा भास होऊ लागला.

सदेह वैकुण्ठागमन  केलेले तुकाराम महाराज _ यांनी भजनाची गोडी लावली.ईश्वराचे नामःस्मरण करताना किती तल्लीनता यायला हवी, हे त्यांनी शिकवले. एक दिवस नामःस्मरण करताना संपूर्ण शरीरावर नामःस्मरणाचा थर पसरल्याचे जाणवले. नंतर सारे शरीरच नामःस्मरणाने व्यापून गेले. मनात शब्द उमटले _

तुका उघडोनी डोळे पाही पाही |
पांघरले हरिनाम देही देही ||

टाळ चिपळ्या अन मृदुंग सोबती |
वाजवती सारे गण सभोवती ||

तुका म्हणे आज परब्रह्म झालो |
नाचे ब्रह्मानंदी आनंदात न्हालो ||

गाढवाला गंगेचे पाणी पाजणारे, कुत्र्यापाठी तुपाची वाटी घेऊन धावणारे संत एकनाथ .... मुंगीत देखील विठ्ठलाचे रूप पाहून पायाखाली मुंगीसुद्धा चिरडू नये म्हणून प्रत्येक पाऊल जपून टाकणारा संत रोहिदास .... तर याच्या नेमके उलट .... विठ्ठल नामात भान विसरून तल्लीन झालेले संत गोरा कुंभार .... जी भाजी पिकवतो, खातो त्यातही विठ्ठल कसा शोधावा हे सांगणारे संत चोखामेळा _ ईश्वराचे गुणगान करत फिरणारे संत नामदेव महाराज _ अशी किती तरी संत मंडळी त्यांच्या भक्तीच्या पद्धती शिकवून गेली. 


आता ध्यानाला बसल्यावर मला मी धुनीजवळ किंवा शेकोटीजवळ बसून चिमटा वाजवताना दिसू लागलो. 







Thursday 4 September 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १२




१९९६ - गजानन महाराज आणि गाडगेबाबा

परमहंसांनी देवीच्या मातृत्वाला हात घालण्याची, हाक मारण्याची, साद घालण्याची शिकवण दिली. तिला अभिप्रेत असलेली पुत्राची हाक कशी मारावी ते शिकवले म्हणूनच तिचे हे दर्शन होऊ शकले.

नंतर  काही काळ कोणीतरी कानात जोरात ओरडायचे "गण गण गणात बोते" _ काही दिवस हे सतत चालू राहीले. अगदी कानठळ्या बसतील अशा गगनभेदी आवाजात हा जप कानात आणि मनात चालू असायचा. पण तो आवाज कधीही असह्य झाला नाही. उलट सारे आयुष्य सुसह्य झाले. त्या काळात मी सर्वांशी नेहमीप्रमाणे बोलत असलो तरी मनात चक्क "मले .. तुले .. मी नाई बा ... " अशा स्वरूपाची तुटक वाक्ये चालू असायची. त्यामुळे इतरांशी बोलताना शब्द जपून वापरावे लागायचे. कधी कधी चुकून याच भाषेत शब्द तोंडातून निसटून जायचे आणि लोक एखाद्या वेड्याकडे  पाहावे तसे माझ्याकडे पहायचे.

साधारण याच काळात संत गाडगेबाबा यांच्याही शिकवणीचा लाभ झाला. कधीही न ऐकलेली खानदेशी - वऱ्हाडी अशी कुठली तरी भाषा कानात ऐकू यायची _ मनात उमटायची. मग लोकांशी बोलताना तसेच बोलावेसे वाटायचे. बोलण्यावर खूप नियंत्रण ठेवावं लागे. मग बोलणच कमी केलं. बऱ्याच जणांना मी शिष्ट व स्वतःला शहाणा समजणारा वाटलो असेन. पण खरं कारण कसं सांगणार?

आता मला हाती  चिपळ्या धरल्याचा भास होऊ लागला. 



Sunday 20 July 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ११



१९९६ - स्वामी रामकृष्ण परमहंस

येशूच्या आवरणातून मी बाहेर आलो न आलो तोच अचानक आई जगदम्बेबद्दल अपार ओढ वाटू लागली. तिच्याबद्दल अलोट प्रेम, स्नेह, माया  मनामध्ये दाटून येऊ लागली.

माझ्याजागी मला कोणी थोडीशी दाढी वाढलेला माणूस दिसू लागे. मनात कधीही न ऐकलेले बंगाली भाषेतील गाणी, भजने, आरती असे काही आपोआप सुरु होई. कधी तो माणूस मला समोर बसलेला दिसे आणि बाजूला बोट करून काही सांगत असे. त्याच्या बोटाच्या रोखाने पाहताच तिथे देवी प्रत्यक्ष उभी असलेली दिसे.

मी तिला "आई" म्हणून हाक मारू लागलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या प्रत्येक हाकेनंतर ती मला दिसू लागली. आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा ... अशा अनेक रूपाने वावरणारी ती ... कधी लक्ष्मीमाता, कधी गायत्रीमाता, कधी भवानीमाता तर कधी सरस्वतीमाता अशा अनेक नयनमनोहर रूपांमध्ये दिसू लागली. कधी कधी कालीमातेच्या तर कधी चंडिकामातेच्या   रौद्रावतारात दिसली. पण चेहरा रौद्र असूनही ती सौम्यदर्शना होती. तिचे ते रूपही भयंकर वा भितीदायक न वाटता, आई म्हणून हवेहवेसे वाटले.

स्वामी विवेकानंदांचे गुरु, स्वामी रामकृष्ण परमहंस या शक्तीची ती चुणूक होती. त्यांना आईबद्दल जी ओढ होती त्याच्या कणभरदेखील एखाद्याला वाटले तर तो कुठच्या कुठे पोहोचेल.

परमहंसांनी देवीच्या मातृत्वाला हात घालण्याची, हाक मारण्याची, साद घालण्याची शिकवण दिली. तिला अभिप्रेत असलेली पुत्राची हाक कशी मारावी ते शिकवले म्हणूनच तिचे हे दर्शन होऊ शकले.



Friday 18 July 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १०



१९९६ - येशु ख्रिस्त

काही दिवसात मला मी ध्यानाला बसलेला असताना चर्चमध्ये बसलेला आहे असे जाणवू लागले. 

जरी मी अर्धपद्मासन घालून बसलेला असे तरी मला भासत असे की मी एका टेबलासमोर गुढगे दुमडून बसलेला आहे. हाताचे पंजे एकमेकात गुंफून त्या टेबलावर कोपर टेकवून मी डोळे बंद करून प्रार्थना करत आहे. कधी कधी भास होत असे की मी घरात ध्यानाला बसलेला नसून कुठे तरी चर्चमध्ये बसलेला आहे. 

ध्यानातून जागे झाल्यावर रात्री झोपेपर्यंत जगातल्या प्रत्येक जीवाबद्दल करुन दाटून येत असे. प्रत्येकाबद्दल ... अगदी अनोळखी लोकांबद्दलदेखील ममत्व वाटत असे. कोणी भांडत असतील किंवा एकमेकांविषयी उलटसुलट बोलत असतील तर मनात शब्द उमटत असत, "हे ईश्वरा, ते काय करत आहेत ते त्यांना माहिती नाही. त्यांना क्षमा कर." 

मला लक्षात आले की मी आता येशूच्या आवरणात आहे आणि तो किंवा ती शक्ती माझ्यात काही तरी भरत आहे. 

नंतर काही काळाने एक पुस्तक वाचनात आले. त्यात स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या काही गोष्टी होत्या ज्या माझ्या अनुभवांशी तंतोतंत जुळत होत्या. तसेच असेही वाचनात आले की स्वामीजींसोबत काही काळ येशु राहीला होता. आणि मला माझ्या अनुभवांचे गूढ उमगले .. प्रमाण मिळाले.



Saturday 12 April 2014

"तनी माझ्या झिंगु लागे ..."



काल, बऱ्याच दिवसांनी ती भेटली .... पहिलाच प्रश्न .... "अरे आहेस कुठे तू? किती दिवस झाले.... तुझी कविता वाचायला मिळाली नाही. काय लिहिलयस नवीन?"

"काय ग .. या कविता तुम्ही वाचून विसरून जाता. फार तर कधी तरी FB वर एखादा लाईक मारता. कशाला लिहायचं मी? आणि लिहिलं तरी कशाला पब्लिश करायचं?"

"अरे तुला माहिती नसेल .. पण तुझ्या कविता नं ... खरच छान असतात. मला आवडतात. आयुष्य एकदम छान आहे रे .. पण तरीही कधी कधी आयुष्यात एकदम पोकळी झाल्यासारखी वाटते. सारे काही छान असूनही काही तरी कमी आहे अस वाटत. तुझी कविता वाचली की खूप छान वाटत. मन एकदम हलक होऊन जात. मनावरच मळभ एकदम हटून जात. सांग नं .. काय लिहिलयस नवीन?" 

काय सांगणार? डोंबल माझं .. काहीच सुचतं नाहीय गेले काही दिवस .. असं का होतंय? काही कळत नाहीय.

"नाही ग ... काही नवीन सुचलं नाहीय.... मनाला भिडणारा असा काही विषय नाही."

"काय फ़ेकतोयस .... अरे केव्हढे विषय आहेत. जरा आजूबाजूला बघ."  

खरच! असं काय झालाय मला .... काही सुचतंच नाहीय. किती दिवस झाले. मन कशात गुंतलंय? 

काम? ... ते तर नेहमीचाच आहे. पूर्वीही होत.
मोकळा वेळ? .... मिळतोय की. 
आजूबाजूला लक्ष? .... आहे की. 
मग? ... काय करतोय मी हल्ली? 

अरे हो! गेले काही दिवस ते "तनी माझ्या झिंगु लागे ..." मनात पिंगा घालतंय. पहिले  कविता  सुचली. नंतर गाण्याची चाल सुचली आणि ती पिच्छाच सोडत नाहीय. गेले काही महिने मी हेच गाणे सतत गातोय. त्याच्या संगीताचे सूर मनात फेर धरून नाचतायत. एखादी चांगली गायिका .. तिच्याकडून हे गाणे करून घ्यायचे ... सतत हाच विचार .... मग दुसरे काही सुचणार कसे?  मी या माझ्याच कवितेच्या की गाण्याच्या प्रेमात पडलोय. कोणताही कलाकार जेंव्हा त्यानेच निर्माण केलेल्या कलाकृतीच्या प्रेमात पडतो तेंव्हा नवनिर्मिती थांबते. ऐकलं होत .... आता पटतंय.

आता हे गाणे कधी पिच्छा सोडेल तेंव्हाच काही तरी नवीन सुचेल.  





एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ९



१९९५ - स्वामी विवेकानंद

आता मी ध्यान एकाग्र करून बसू लागलो. चित्त आपोआप  एकाग्र होऊ लागले. भोवतीचे माउलींचे आवरण विरळ होत गेले. काही दिवसांनी नवे आवरण जाणवू लागले.

बसण्याची पद्धत सहजपणे  बदलत गेली. मी  वेगवेगळ्या मुद्रांमध्ये बसत होतो. प्रत्येक बसण्याच्या पद्धतीचे वेगवेगळे अनुभव येत होते. त्याचे फायदे आणि तोटे कोणीतरी मला सांगत होते. कानात काही ऐकू येत नव्हते. पण थेट मनात शब्द उमटत होते.

एखाद्या योग्याने कसे संयत असावे? योगांचे प्रकार कोणते? कोणत्या योग्याने कोणती साधना करावी? ध्यान कसे लावावे? कोणत्या पद्धतीचे कसे फायदे होतात आणि कोणते तोटे होतात? हे सारे कोणीतरी सांगत होते. मनात आपोआप सांगणाऱ्याचे नाव उमटत होते .... "स्वामी विवेकानंद"! मला जे उमजत होते ते बरेचदा प्रचलित गोष्टींपेक्षा खूप वेगळे होते.

त्यांनी सांगितले की "जगातले बहुतांश ज्ञान नष्ट झाले आहे. आज जे सांगितले जाते ते लोकांनी आपल्या स्वार्थापोटी मूळ ज्ञानाची केलेली भ्रष्ट नक्कल आहे. माझ्यापाशी असलेले ज्ञान हे अल्पस्वल्प आहे. त्याच्या कित्येक पटीने पसरलेला ज्ञानाचा महासागर अजून बाकी आहे."

काही दिवसात मला मी ध्यानाला बसलेला असताना चर्चमध्ये बसलेला आहे असे जाणवू लागले. 


Friday 11 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ८



१९९५ - श्री ज्ञानेश्वर महाराज

ज्ञानेश्वरी वाचत होतो. मनात आपोपाप अर्थ उमटत होता. ज्ञानेश्वरी लिहिताना त्यांना काय नेमके सांगायचे होते ते आपोआप मनाला उमजत होते. तसेच आज विशिष्ठ ओवीचा ... कोणत्याही संदर्भात संबंध जोडून सांगितला जाणारा अर्थ ... हा कसा चुकीचा आहे आणि त्यामुळे मार्ग कसा चुकतो हे समजत होते. साधी सोपी सरळ ज्ञानेश्वरी ... तिचा गूढ अर्थ शोधण्यात वेळ घालवून लोकांनी गहन करून टाकली.

निसर्गाचे काही नियम आहेत. कोणता नियम कोठे लागू पडतो, कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी वापरावी याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरी वाचून झाली आणि पसायदान सुरु झाले. सावकाश वाचताना त्याचा ओळीमागून ओळ ... अर्थ ध्यानात येऊ लागला. सुंदर अनुभव होता. त्या काळात भोवताली एक आवरण अनुभवत होतो. मन एकदम मऊ झाले होते. जणू दुधात भिजले होते. जणू माउली माझ्याकडून ज्ञानेश्वरी जगवून घेत होती.

एक दिवस ... नेहमीप्रमाणे कामावरून उशीरा परत येताना ... लोकलच्या दरवाजात उभा होतो. आकाशाकडे पहात.  गाडी बऱ्यापैकी रिकामी होती. गाडीने मुंब्रा स्टेशन सोडले. दुरवर डोंगरांची रांग घसरली होती. हिरवीगार झाडी पसरलेली पाहत होतो. एका मग्न क्षणी ... मला सारे जग परमेश्वराने व्यापलेले दिसू लागले. प्रत्येक वस्तू .. अगदी अणु रेणू त्याने कसा व्यापला आहे ते उमजू लागले. मनात .. कि कानात .... कोणीतरी बोलले ....

व्यापीले अवघे जीवाणू |
तैसे व्यापीयले अणु रेणू |
कवणे सांगावे कवणु |

आता मी ध्यानाला बसू लागलो. चित्त आपोआप   एकाग्र होऊ लागले. भोवतीचे माउलींचे आवरण विरळ होत गेले. काही दिवसांनी नवे आवरण जाणवू लागले.


Monday 7 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ७

१९९५

नशिबाने म्हणा वा पूर्वपुण्याईने .... आयुष्यात अध्यात्मिक मार्गातली एक अधिकारी व्यक्ती आली. तिच्या पाठीमागे देवीची साडेतीन शक्तिपीठे उभी आहेत असे म्हटले जात असे. माझ्या हातून त्या व्यक्तीची काही थोडी फार सेवा घडली. मनात त्याबदल्यात काही अपेक्षा नव्हती.

असेच एकदा आम्ही सारे जेवायला बसले असताना त्या व्यक्तीने मला विचारले, "मला तुला काही तरी द्यायचे आहे. बोल तुला काय हवे - छत्री की छत्र?"

मी उत्तरलो, "मला यातले काही काळात नाही. मी जे केले ते काही मिळावे या अपेक्षेने नाही. त्यामुळे मी काही मागू शकत नाही आणि मागू इच्छित नाही."

त्या व्यक्तीने तिथे उपस्थित असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलून मला सांगितले, " जा .. तुला छत्र दिले."

त्या दिवसापासून मला माझ्याभोवती सतत एक आवरण जाणवत असते. मी जे काही करतो ते करण्यासाठी मला कोणी तरी सांगत असते. मला असे जाणवते की मी काही करत नाही. जे होते ते आपोआप होते.

________________________________________________________________


एक दिवस त्या व्यक्तीने मला सांगितले, " तुला खूप प्रश्न पडतात ना? जा ... तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील."

त्या दिवसानंतर मला कोणताही प्रश्न पडला की त्याचे उत्तर त्याच प्रश्नाच्या हातात हात घेऊन येते. प्रश्न हा प्रश्न राहातच नाही. इतरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत किंवा त्यांना पडणारे प्रश्नदेखील मी माझे म्हणून स्वीकारले की त्याची उत्तरे किंवा विश्लेषण लगेच समोर उभे राहते.



Sunday 6 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ६



१९९४ .... जून

सर्व सोडून देऊ इच्छित होतो. देवघरासमोर बसलेला असताना तळमळीने ईश्वराला प्रार्थना केली, " कधी काळी मी जी पुण्यकर्मे केली असतील .. या जन्मात किंवा पूर्वजन्मात .. त्या सर्वांचे फळ मी आईला दान करू इच्छितो. आज ... आत्ता ... या क्षणी ... ते सर्व पुण्य आईला मिळावे जेणेकरून तिची या जीवन मृत्युच्या चक्रातून सुटका होईल. तिच्या सुटकेसाठीचे पुण्य तिला मिळाल्यावर जर काही शिल्लक असेल तर ते सर्व माझ्या वडिलांना मिळावे. आज, आत्ता, या क्षणी मी या पुण्यावर पाणी सोडून देत आहे."

तत्क्षणी माझ्या शरीरातून काही बाहेर पडल्याची जाणीव झाली. शरीर रिकामे झाल्याची जाणीव झाली. दुसऱ्याच क्षणी आत खोलवर कुठे तरी वीज चमकावी तसे झाले. शरीराला एक झोरदार झटका बसला आणि जे कमी झाले त्याच्या दुप्पट शक्ती भरल्याची जाणीव झाली.

जुलै १९९४ मध्ये पुन्हा अशीच प्रार्थना केल्यावर परत असाच अनुभव आला.

निस्वार्थी प्रार्थना केल्यास ती झटक्यात पूर्ण  होते. फळाची अपेक्षा ठेवली नाही किंबहुना मिळणाऱ्या फळाची जाणीवही नसेल तर त्या कर्माचे खूप मोठ्या प्रमाणावर फळ मिळते.

या निस्वार्थी प्रार्थना होत्या. परत काही मिळेल याची अपेक्षा किंवा शक्ती वाढणार याची जाणीव नव्हती. म्हणून पूर्ण झाल्या .... शक्ती वाढली. आता प्रार्थना केली तर शक्ती वाढते याची जाणीव आहे. मग निस्वार्थी दान होईल का? शक्ती अशी वाढणार नाही.

मी प्रार्थना थांबवली.




Wednesday 2 April 2014

एका योग्याची डायरी - भाग ५

|| श्री स्वामी समर्थ ||

आता आरती, भजन यांचा विचार करू.

भजन आणि आरती हे दोन्ही मुख्यतः सामुहीक स्वरूपात केले जाणारे साधनाप्रकार आहेत. या दोन्ही प्रकारांमध्ये साथीला टाळ, चिपळ्या, पेटी (Harmonium) आणि तबला/ मृदंग/ ढोलक अशी वाद्ये असतात. मात्र हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत.

भजन हे देवाला आळवण्यासाठी केले जाते. त्यात बरेचदा कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट स्वरुपात मागणे मागितलेले असते. तर कधी कधी परिस्थितीवरचे भाष्य असते. साधारणतः अभंग हा प्रकार यात प्रामुख्याने दिसून येतो. अभंगांव्यतिरिक्त ओव्या आणि भारुडासारखी देवावर रचलेली गीतेदेखील भजनातच समाविष्ट करता येतात. हा देवासमोर बसून सादर करायचा अविष्कार आहे.

आरती ही देवाची स्तुती आणि कौतुक असते किंवा त्याने जे जे केले त्याबद्दल त्याचे आभार स्वरूपी वर्णन असते. त्यात सहसा देवाचे श्रेष्ठत्व किंवा त्याची महानता वर्णन केलेली असते. यात देवाचे शारीरिक किंवा अध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन असते. कधी कधी कौटुंबिक वर्णनही यात असते. उदाहरणार्थ - पार्वतीच्या आरतीमध्ये गणपती, कार्तिकेय, महादेव यांची नावे समाविष्ट असणे.

या दोन्ही साधनांमध्ये सामुहीक नाद हा अत्यंत महत्वाचा असतो. व्यवस्थित निर्माण झालेला नाद निसर्गातील Positive कणांना समूहाकडे खेचून घेतो. उदाहरण द्यायचे झाले तर आपण एकेकटे एखाद्या छोट्याशा चुंबकासारखे असतो. प्रत्येकाचे वैयक्तिक बल / बळ हे १० एकक असेल तर २५ जणांचे एकत्रित बळ २५० एकक बनते. हे एकत्रित बळ जास्त वेगाने आणि दूरवरचे कण आकर्षित करू शकते.
मात्र कधी कधी असे नाद हे नाद न राहता उन्माद बनतात. ज्याला उन्माद होतो त्याला आपण कोणी देवस्वरूप झाल्याचा भास होतो. ज्यांना असा उन्माद होत नाही त्यांना ही व्यक्ती काही विशेष आहे असे वाटू लागते. आणि ..... आरती बाजूला राहून व्यक्तिस्तोम वाढू लागते.

या दोन्ही प्रकारांमध्ये एक कमतरता असते. तुम्ही आरती आणि भजन केलेत की जोपर्यंत त्या समूहाबरोबर असता, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या शरीरात आणि आजूबाजूच्या वातावरणात Positive Energy जाणवते. मात्र तुम्ही तिथून घरी गेलात की ही Energy झपाट्याने कमी झालेली आढळते. भजन किंवा आरतीच्या ठिकाणी उत्पन्न वा जमा झालेली Energy तुम्ही वैयक्तिक स्वरुपात किती शोषून घेऊ शकता (सोप्या शब्दात – शरीरात किंवा मनात भरून घेऊ शकता) यावर त्या भजन किंवा आरतीचा तुमच्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. बरेचदा आरती खूप छान झाली असे वाटते पण जीवन फारसे बदलत नाही. मग भजन किंवा आरती यांना महत्व नाही का? .... महत्व आहे .... भजन किंवा आरती हे वैयाक्तिक साधनेला उभारणी देण्याचे काम करतात. याला English मध्ये Boosting किंवा Charging असे म्हणता येईल.

श्री. सिद्धेश धुमे यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे गेल्या चार भागात थोडेसे विषयांतर होऊन मूळ विषय बाजूला पडला. खरे तर हे विषय खूप विस्तीर्ण आहेत आणि त्यांच्या विस्तारात प्रत्येकाला रस असेलच असे नाही. अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि थोडक्यात आपण हे विषय Cover करण्याचा प्रयत्न केला. ज्यांना विस्तारपूर्वक Discussion करायचे आहे किंवा काही मते पटली नाहीत, ते कधीही ब्लॉगवर किंवा FB वर लिहू शकतात. मलाही माझे ज्ञान वृद्धिंगत करण्यास आवडेल.

जे विषयांतर झाले ते चांगल्यासाठीच असे मी मानतो. त्या योग्याचे काही अनुभव हे आत्तापर्यंत सादर केलेल्या लिखाणाला पुष्टी देणारे ठरतील असा माझा विश्वास आहे. आपल्यासमोर काही तरी GREAT किंवा भव्य दिव्य असे ठेवण्यासाठी हे अनुभव नाहीत. तसेच कुणाचा बडेजाव मांडण्यासाठीही नाहीत. जर कुणी अभ्यासू स्वतःच्या अनुभवाविषयी शंकीत झाला असेल किंवा विश्लेषण करू इच्छित असेल तर त्याला तुलना / विश्लेषण करणे सोपे जावे म्हणून हे लिहिले आहे हे कृपया लक्षात घ्यावे.


Let us start the diary of his Experience.

Tuesday 1 April 2014

एका योग्याची डायरी - भाग ४

|| श्री स्वामी समर्थ ||


जे योगी, संत, स्वामी असे थोर सत्पुरुष इतिहासात होऊन गेले त्यांना एक व्यक्ती मानता मी शक्ती मानतो. जर शक्ती नष्ट होत नाही तर ते योगी नाहीसे झालेले नाहीत. ती शक्ती ते विशिष्ट शारीरिक रूप सोडून दुसऱ्या कुठल्या तरी शक्तीत रुपांतरीत (converted) झालेली आहे. ती याच वातावरणात अस्तित्वात आहे. आपण जर शोध घेतल्यावर ती शक्ती आपल्याला सापडू शकते.

आता याचा शोध कसा घ्यायचा ?

जसे साधक या शक्तीचा शोध घेतात तसेच या शक्ती देखील साधकांचा शोध घेत असतात. साधना जेंव्हा विशिष्ट पातळीवर पोहोचते तेंव्हा अशा शक्ती पोआप त्या साधकाशी संपर्क साधतात.  "जेंव्हा योग्य शिष्य तयार होतो तेंव्हा त्याला गुरु आपणहून प्राप्त होतो” हा गुरु शिष्य संबंधातील एक निसर्गनियम आहे.

जी साधना आपण सहजपणे करू शकतो ती आपल्याला केंव्हाही अनुकूल ठरते आणि म्हणूनच तीच साधना सुरु ठेवावी. ध्यान, धारणा हे काहीसे कठीण विषय आहेत. इथे मार्गदर्शनाची गरज भासते. चूक झाल्यास विपरीत परिणाम घडू शकतात. पण आरती, जप, भजन, नामःस्मरण यासारख्या सोप्या मार्गावर प्राथमिक अवस्थेत असताना थेट मार्गदर्शनाची गरज नसते. कोणताही चांगला शिक्षक (साधक नव्हे) आपल्याला यात मार्गदर्शन करू शकतो.

आपण प्रथम नामःस्मरण पाहू. यात कशी प्रगती किंवा अधोगती होते ते अभ्यासायचा प्रयत्न करू.
Energy never get destroyed. It can be converted from one source to another. The form is changed but energy always exists.

मग आजवर ज्यांनी नामस्मरण केले ते सारे या वातावरणातच असायला हवे. ते नष्ट होऊ शकत नाही. पण विखुरलेल्या स्वरूपात आहे. वातावरणात या कणांचे समुदाय अस्तित्वात असतात. जसे काही विशिष्ट देवळात गेले कि आपल्याला खूप मंगल, प्रसन्न वाटते. तर्कही विशिष्ट ठिकाणी आपल्याला अस्वस्थ वाटते. तिथे थांबवत नाही.

हे कण Positive (मंगल) आणि Negative (अमंगल) असे दोन्ही प्रकारचे असतात. माणसांच्या आचार आणि विचारांवर त्याच्याकडे आकर्षीत होणाऱ्या कणांचा प्रकार अवलंबून असतो. साधक जेंव्हा साधना करतो तेंव्हा हेच विखुरलेले कण (नामाचेज्ञानाचे) त्याच्याभोवती जमा होतात. या कणांचा समुदाय जसा जसा वाढू लागतो तसा तसा त्याच्या भोवतीच्या वातावरणात फरक पडू लागतोचांगल्या विचाराने प्रेरित लोकांभोवती Positive कण जमा होतात आणि कुविचाराने प्रेरित लोकांभोवती Negative.  सर्वसाधारण माणसे कोणत्या ना कोणत्या प्रभावाखाली दोन्ही प्रकारचे विचार करत असतात. त्यांच्या भोवतीचे वातावरण अशा दोन्ही प्रकारच्या कणांनी भारलेले असते.

योग्य प्रकारे साधना केल्यावर अंतर्शक्ती जागृत होते. मात्र त्या शक्तीला आपण ज्या आचार विचारांची जोड देऊ, तसे तिचे रूप असते. माणसांचे आचार विचार Constructive असतील तर Positive  कण जमा होत जातात. मात्र आचार विचार Destructive असतील तर Negative कणदेखील जमा होतात. जसे चुंबकाकडे लोखंडाचा कीस आकर्षीत होतो तसे हे कण साधकाकडे आकर्षीत होतात.


आता आरती, भजन यांचा विचार करू.