Sunday 6 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ६



१९९४ .... जून

सर्व सोडून देऊ इच्छित होतो. देवघरासमोर बसलेला असताना तळमळीने ईश्वराला प्रार्थना केली, " कधी काळी मी जी पुण्यकर्मे केली असतील .. या जन्मात किंवा पूर्वजन्मात .. त्या सर्वांचे फळ मी आईला दान करू इच्छितो. आज ... आत्ता ... या क्षणी ... ते सर्व पुण्य आईला मिळावे जेणेकरून तिची या जीवन मृत्युच्या चक्रातून सुटका होईल. तिच्या सुटकेसाठीचे पुण्य तिला मिळाल्यावर जर काही शिल्लक असेल तर ते सर्व माझ्या वडिलांना मिळावे. आज, आत्ता, या क्षणी मी या पुण्यावर पाणी सोडून देत आहे."

तत्क्षणी माझ्या शरीरातून काही बाहेर पडल्याची जाणीव झाली. शरीर रिकामे झाल्याची जाणीव झाली. दुसऱ्याच क्षणी आत खोलवर कुठे तरी वीज चमकावी तसे झाले. शरीराला एक झोरदार झटका बसला आणि जे कमी झाले त्याच्या दुप्पट शक्ती भरल्याची जाणीव झाली.

जुलै १९९४ मध्ये पुन्हा अशीच प्रार्थना केल्यावर परत असाच अनुभव आला.

निस्वार्थी प्रार्थना केल्यास ती झटक्यात पूर्ण  होते. फळाची अपेक्षा ठेवली नाही किंबहुना मिळणाऱ्या फळाची जाणीवही नसेल तर त्या कर्माचे खूप मोठ्या प्रमाणावर फळ मिळते.

या निस्वार्थी प्रार्थना होत्या. परत काही मिळेल याची अपेक्षा किंवा शक्ती वाढणार याची जाणीव नव्हती. म्हणून पूर्ण झाल्या .... शक्ती वाढली. आता प्रार्थना केली तर शक्ती वाढते याची जाणीव आहे. मग निस्वार्थी दान होईल का? शक्ती अशी वाढणार नाही.

मी प्रार्थना थांबवली.




No comments: