Sunday, 20 July 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ११



१९९६ - स्वामी रामकृष्ण परमहंस

येशूच्या आवरणातून मी बाहेर आलो न आलो तोच अचानक आई जगदम्बेबद्दल अपार ओढ वाटू लागली. तिच्याबद्दल अलोट प्रेम, स्नेह, माया  मनामध्ये दाटून येऊ लागली.

माझ्याजागी मला कोणी थोडीशी दाढी वाढलेला माणूस दिसू लागे. मनात कधीही न ऐकलेले बंगाली भाषेतील गाणी, भजने, आरती असे काही आपोआप सुरु होई. कधी तो माणूस मला समोर बसलेला दिसे आणि बाजूला बोट करून काही सांगत असे. त्याच्या बोटाच्या रोखाने पाहताच तिथे देवी प्रत्यक्ष उभी असलेली दिसे.

मी तिला "आई" म्हणून हाक मारू लागलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या प्रत्येक हाकेनंतर ती मला दिसू लागली. आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा ... अशा अनेक रूपाने वावरणारी ती ... कधी लक्ष्मीमाता, कधी गायत्रीमाता, कधी भवानीमाता तर कधी सरस्वतीमाता अशा अनेक नयनमनोहर रूपांमध्ये दिसू लागली. कधी कधी कालीमातेच्या तर कधी चंडिकामातेच्या   रौद्रावतारात दिसली. पण चेहरा रौद्र असूनही ती सौम्यदर्शना होती. तिचे ते रूपही भयंकर वा भितीदायक न वाटता, आई म्हणून हवेहवेसे वाटले.

स्वामी विवेकानंदांचे गुरु, स्वामी रामकृष्ण परमहंस या शक्तीची ती चुणूक होती. त्यांना आईबद्दल जी ओढ होती त्याच्या कणभरदेखील एखाद्याला वाटले तर तो कुठच्या कुठे पोहोचेल.

परमहंसांनी देवीच्या मातृत्वाला हात घालण्याची, हाक मारण्याची, साद घालण्याची शिकवण दिली. तिला अभिप्रेत असलेली पुत्राची हाक कशी मारावी ते शिकवले म्हणूनच तिचे हे दर्शन होऊ शकले.



Friday, 18 July 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग १०



१९९६ - येशु ख्रिस्त

काही दिवसात मला मी ध्यानाला बसलेला असताना चर्चमध्ये बसलेला आहे असे जाणवू लागले. 

जरी मी अर्धपद्मासन घालून बसलेला असे तरी मला भासत असे की मी एका टेबलासमोर गुढगे दुमडून बसलेला आहे. हाताचे पंजे एकमेकात गुंफून त्या टेबलावर कोपर टेकवून मी डोळे बंद करून प्रार्थना करत आहे. कधी कधी भास होत असे की मी घरात ध्यानाला बसलेला नसून कुठे तरी चर्चमध्ये बसलेला आहे. 

ध्यानातून जागे झाल्यावर रात्री झोपेपर्यंत जगातल्या प्रत्येक जीवाबद्दल करुन दाटून येत असे. प्रत्येकाबद्दल ... अगदी अनोळखी लोकांबद्दलदेखील ममत्व वाटत असे. कोणी भांडत असतील किंवा एकमेकांविषयी उलटसुलट बोलत असतील तर मनात शब्द उमटत असत, "हे ईश्वरा, ते काय करत आहेत ते त्यांना माहिती नाही. त्यांना क्षमा कर." 

मला लक्षात आले की मी आता येशूच्या आवरणात आहे आणि तो किंवा ती शक्ती माझ्यात काही तरी भरत आहे. 

नंतर काही काळाने एक पुस्तक वाचनात आले. त्यात स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या काही गोष्टी होत्या ज्या माझ्या अनुभवांशी तंतोतंत जुळत होत्या. तसेच असेही वाचनात आले की स्वामीजींसोबत काही काळ येशु राहीला होता. आणि मला माझ्या अनुभवांचे गूढ उमगले .. प्रमाण मिळाले.



Saturday, 12 April 2014

"तनी माझ्या झिंगु लागे ..."



काल, बऱ्याच दिवसांनी ती भेटली .... पहिलाच प्रश्न .... "अरे आहेस कुठे तू? किती दिवस झाले.... तुझी कविता वाचायला मिळाली नाही. काय लिहिलयस नवीन?"

"काय ग .. या कविता तुम्ही वाचून विसरून जाता. फार तर कधी तरी FB वर एखादा लाईक मारता. कशाला लिहायचं मी? आणि लिहिलं तरी कशाला पब्लिश करायचं?"

"अरे तुला माहिती नसेल .. पण तुझ्या कविता नं ... खरच छान असतात. मला आवडतात. आयुष्य एकदम छान आहे रे .. पण तरीही कधी कधी आयुष्यात एकदम पोकळी झाल्यासारखी वाटते. सारे काही छान असूनही काही तरी कमी आहे अस वाटत. तुझी कविता वाचली की खूप छान वाटत. मन एकदम हलक होऊन जात. मनावरच मळभ एकदम हटून जात. सांग नं .. काय लिहिलयस नवीन?" 

काय सांगणार? डोंबल माझं .. काहीच सुचतं नाहीय गेले काही दिवस .. असं का होतंय? काही कळत नाहीय.

"नाही ग ... काही नवीन सुचलं नाहीय.... मनाला भिडणारा असा काही विषय नाही."

"काय फ़ेकतोयस .... अरे केव्हढे विषय आहेत. जरा आजूबाजूला बघ."  

खरच! असं काय झालाय मला .... काही सुचतंच नाहीय. किती दिवस झाले. मन कशात गुंतलंय? 

काम? ... ते तर नेहमीचाच आहे. पूर्वीही होत.
मोकळा वेळ? .... मिळतोय की. 
आजूबाजूला लक्ष? .... आहे की. 
मग? ... काय करतोय मी हल्ली? 

अरे हो! गेले काही दिवस ते "तनी माझ्या झिंगु लागे ..." मनात पिंगा घालतंय. पहिले  कविता  सुचली. नंतर गाण्याची चाल सुचली आणि ती पिच्छाच सोडत नाहीय. गेले काही महिने मी हेच गाणे सतत गातोय. त्याच्या संगीताचे सूर मनात फेर धरून नाचतायत. एखादी चांगली गायिका .. तिच्याकडून हे गाणे करून घ्यायचे ... सतत हाच विचार .... मग दुसरे काही सुचणार कसे?  मी या माझ्याच कवितेच्या की गाण्याच्या प्रेमात पडलोय. कोणताही कलाकार जेंव्हा त्यानेच निर्माण केलेल्या कलाकृतीच्या प्रेमात पडतो तेंव्हा नवनिर्मिती थांबते. ऐकलं होत .... आता पटतंय.

आता हे गाणे कधी पिच्छा सोडेल तेंव्हाच काही तरी नवीन सुचेल.  





एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ९



१९९५ - स्वामी विवेकानंद

आता मी ध्यान एकाग्र करून बसू लागलो. चित्त आपोआप  एकाग्र होऊ लागले. भोवतीचे माउलींचे आवरण विरळ होत गेले. काही दिवसांनी नवे आवरण जाणवू लागले.

बसण्याची पद्धत सहजपणे  बदलत गेली. मी  वेगवेगळ्या मुद्रांमध्ये बसत होतो. प्रत्येक बसण्याच्या पद्धतीचे वेगवेगळे अनुभव येत होते. त्याचे फायदे आणि तोटे कोणीतरी मला सांगत होते. कानात काही ऐकू येत नव्हते. पण थेट मनात शब्द उमटत होते.

एखाद्या योग्याने कसे संयत असावे? योगांचे प्रकार कोणते? कोणत्या योग्याने कोणती साधना करावी? ध्यान कसे लावावे? कोणत्या पद्धतीचे कसे फायदे होतात आणि कोणते तोटे होतात? हे सारे कोणीतरी सांगत होते. मनात आपोआप सांगणाऱ्याचे नाव उमटत होते .... "स्वामी विवेकानंद"! मला जे उमजत होते ते बरेचदा प्रचलित गोष्टींपेक्षा खूप वेगळे होते.

त्यांनी सांगितले की "जगातले बहुतांश ज्ञान नष्ट झाले आहे. आज जे सांगितले जाते ते लोकांनी आपल्या स्वार्थापोटी मूळ ज्ञानाची केलेली भ्रष्ट नक्कल आहे. माझ्यापाशी असलेले ज्ञान हे अल्पस्वल्प आहे. त्याच्या कित्येक पटीने पसरलेला ज्ञानाचा महासागर अजून बाकी आहे."

काही दिवसात मला मी ध्यानाला बसलेला असताना चर्चमध्ये बसलेला आहे असे जाणवू लागले. 


Friday, 11 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ८



१९९५ - श्री ज्ञानेश्वर महाराज

ज्ञानेश्वरी वाचत होतो. मनात आपोपाप अर्थ उमटत होता. ज्ञानेश्वरी लिहिताना त्यांना काय नेमके सांगायचे होते ते आपोआप मनाला उमजत होते. तसेच आज विशिष्ठ ओवीचा ... कोणत्याही संदर्भात संबंध जोडून सांगितला जाणारा अर्थ ... हा कसा चुकीचा आहे आणि त्यामुळे मार्ग कसा चुकतो हे समजत होते. साधी सोपी सरळ ज्ञानेश्वरी ... तिचा गूढ अर्थ शोधण्यात वेळ घालवून लोकांनी गहन करून टाकली.

निसर्गाचे काही नियम आहेत. कोणता नियम कोठे लागू पडतो, कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी वापरावी याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

ज्ञानेश्वरी वाचून झाली आणि पसायदान सुरु झाले. सावकाश वाचताना त्याचा ओळीमागून ओळ ... अर्थ ध्यानात येऊ लागला. सुंदर अनुभव होता. त्या काळात भोवताली एक आवरण अनुभवत होतो. मन एकदम मऊ झाले होते. जणू दुधात भिजले होते. जणू माउली माझ्याकडून ज्ञानेश्वरी जगवून घेत होती.

एक दिवस ... नेहमीप्रमाणे कामावरून उशीरा परत येताना ... लोकलच्या दरवाजात उभा होतो. आकाशाकडे पहात.  गाडी बऱ्यापैकी रिकामी होती. गाडीने मुंब्रा स्टेशन सोडले. दुरवर डोंगरांची रांग घसरली होती. हिरवीगार झाडी पसरलेली पाहत होतो. एका मग्न क्षणी ... मला सारे जग परमेश्वराने व्यापलेले दिसू लागले. प्रत्येक वस्तू .. अगदी अणु रेणू त्याने कसा व्यापला आहे ते उमजू लागले. मनात .. कि कानात .... कोणीतरी बोलले ....

व्यापीले अवघे जीवाणू |
तैसे व्यापीयले अणु रेणू |
कवणे सांगावे कवणु |

आता मी ध्यानाला बसू लागलो. चित्त आपोआप   एकाग्र होऊ लागले. भोवतीचे माउलींचे आवरण विरळ होत गेले. काही दिवसांनी नवे आवरण जाणवू लागले.


Monday, 7 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ७

१९९५

नशिबाने म्हणा वा पूर्वपुण्याईने .... आयुष्यात अध्यात्मिक मार्गातली एक अधिकारी व्यक्ती आली. तिच्या पाठीमागे देवीची साडेतीन शक्तिपीठे उभी आहेत असे म्हटले जात असे. माझ्या हातून त्या व्यक्तीची काही थोडी फार सेवा घडली. मनात त्याबदल्यात काही अपेक्षा नव्हती.

असेच एकदा आम्ही सारे जेवायला बसले असताना त्या व्यक्तीने मला विचारले, "मला तुला काही तरी द्यायचे आहे. बोल तुला काय हवे - छत्री की छत्र?"

मी उत्तरलो, "मला यातले काही काळात नाही. मी जे केले ते काही मिळावे या अपेक्षेने नाही. त्यामुळे मी काही मागू शकत नाही आणि मागू इच्छित नाही."

त्या व्यक्तीने तिथे उपस्थित असलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलून मला सांगितले, " जा .. तुला छत्र दिले."

त्या दिवसापासून मला माझ्याभोवती सतत एक आवरण जाणवत असते. मी जे काही करतो ते करण्यासाठी मला कोणी तरी सांगत असते. मला असे जाणवते की मी काही करत नाही. जे होते ते आपोआप होते.

________________________________________________________________


एक दिवस त्या व्यक्तीने मला सांगितले, " तुला खूप प्रश्न पडतात ना? जा ... तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील."

त्या दिवसानंतर मला कोणताही प्रश्न पडला की त्याचे उत्तर त्याच प्रश्नाच्या हातात हात घेऊन येते. प्रश्न हा प्रश्न राहातच नाही. इतरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत किंवा त्यांना पडणारे प्रश्नदेखील मी माझे म्हणून स्वीकारले की त्याची उत्तरे किंवा विश्लेषण लगेच समोर उभे राहते.



Sunday, 6 April 2014

एका योग्याची डायरी - काळ .... १९९४ ते १९९७ - भाग ६



१९९४ .... जून

सर्व सोडून देऊ इच्छित होतो. देवघरासमोर बसलेला असताना तळमळीने ईश्वराला प्रार्थना केली, " कधी काळी मी जी पुण्यकर्मे केली असतील .. या जन्मात किंवा पूर्वजन्मात .. त्या सर्वांचे फळ मी आईला दान करू इच्छितो. आज ... आत्ता ... या क्षणी ... ते सर्व पुण्य आईला मिळावे जेणेकरून तिची या जीवन मृत्युच्या चक्रातून सुटका होईल. तिच्या सुटकेसाठीचे पुण्य तिला मिळाल्यावर जर काही शिल्लक असेल तर ते सर्व माझ्या वडिलांना मिळावे. आज, आत्ता, या क्षणी मी या पुण्यावर पाणी सोडून देत आहे."

तत्क्षणी माझ्या शरीरातून काही बाहेर पडल्याची जाणीव झाली. शरीर रिकामे झाल्याची जाणीव झाली. दुसऱ्याच क्षणी आत खोलवर कुठे तरी वीज चमकावी तसे झाले. शरीराला एक झोरदार झटका बसला आणि जे कमी झाले त्याच्या दुप्पट शक्ती भरल्याची जाणीव झाली.

जुलै १९९४ मध्ये पुन्हा अशीच प्रार्थना केल्यावर परत असाच अनुभव आला.

निस्वार्थी प्रार्थना केल्यास ती झटक्यात पूर्ण  होते. फळाची अपेक्षा ठेवली नाही किंबहुना मिळणाऱ्या फळाची जाणीवही नसेल तर त्या कर्माचे खूप मोठ्या प्रमाणावर फळ मिळते.

या निस्वार्थी प्रार्थना होत्या. परत काही मिळेल याची अपेक्षा किंवा शक्ती वाढणार याची जाणीव नव्हती. म्हणून पूर्ण झाल्या .... शक्ती वाढली. आता प्रार्थना केली तर शक्ती वाढते याची जाणीव आहे. मग निस्वार्थी दान होईल का? शक्ती अशी वाढणार नाही.

मी प्रार्थना थांबवली.




Wednesday, 2 April 2014

एका योग्याची डायरी - भाग ५

|| श्री स्वामी समर्थ ||

आता आरती, भजन यांचा विचार करू.

भजन आणि आरती हे दोन्ही मुख्यतः सामुहीक स्वरूपात केले जाणारे साधनाप्रकार आहेत. या दोन्ही प्रकारांमध्ये साथीला टाळ, चिपळ्या, पेटी (Harmonium) आणि तबला/ मृदंग/ ढोलक अशी वाद्ये असतात. मात्र हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत.

भजन हे देवाला आळवण्यासाठी केले जाते. त्यात बरेचदा कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट स्वरुपात मागणे मागितलेले असते. तर कधी कधी परिस्थितीवरचे भाष्य असते. साधारणतः अभंग हा प्रकार यात प्रामुख्याने दिसून येतो. अभंगांव्यतिरिक्त ओव्या आणि भारुडासारखी देवावर रचलेली गीतेदेखील भजनातच समाविष्ट करता येतात. हा देवासमोर बसून सादर करायचा अविष्कार आहे.

आरती ही देवाची स्तुती आणि कौतुक असते किंवा त्याने जे जे केले त्याबद्दल त्याचे आभार स्वरूपी वर्णन असते. त्यात सहसा देवाचे श्रेष्ठत्व किंवा त्याची महानता वर्णन केलेली असते. यात देवाचे शारीरिक किंवा अध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन असते. कधी कधी कौटुंबिक वर्णनही यात असते. उदाहरणार्थ - पार्वतीच्या आरतीमध्ये गणपती, कार्तिकेय, महादेव यांची नावे समाविष्ट असणे.

या दोन्ही साधनांमध्ये सामुहीक नाद हा अत्यंत महत्वाचा असतो. व्यवस्थित निर्माण झालेला नाद निसर्गातील Positive कणांना समूहाकडे खेचून घेतो. उदाहरण द्यायचे झाले तर आपण एकेकटे एखाद्या छोट्याशा चुंबकासारखे असतो. प्रत्येकाचे वैयक्तिक बल / बळ हे १० एकक असेल तर २५ जणांचे एकत्रित बळ २५० एकक बनते. हे एकत्रित बळ जास्त वेगाने आणि दूरवरचे कण आकर्षित करू शकते.
मात्र कधी कधी असे नाद हे नाद न राहता उन्माद बनतात. ज्याला उन्माद होतो त्याला आपण कोणी देवस्वरूप झाल्याचा भास होतो. ज्यांना असा उन्माद होत नाही त्यांना ही व्यक्ती काही विशेष आहे असे वाटू लागते. आणि ..... आरती बाजूला राहून व्यक्तिस्तोम वाढू लागते.

या दोन्ही प्रकारांमध्ये एक कमतरता असते. तुम्ही आरती आणि भजन केलेत की जोपर्यंत त्या समूहाबरोबर असता, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या शरीरात आणि आजूबाजूच्या वातावरणात Positive Energy जाणवते. मात्र तुम्ही तिथून घरी गेलात की ही Energy झपाट्याने कमी झालेली आढळते. भजन किंवा आरतीच्या ठिकाणी उत्पन्न वा जमा झालेली Energy तुम्ही वैयक्तिक स्वरुपात किती शोषून घेऊ शकता (सोप्या शब्दात – शरीरात किंवा मनात भरून घेऊ शकता) यावर त्या भजन किंवा आरतीचा तुमच्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. बरेचदा आरती खूप छान झाली असे वाटते पण जीवन फारसे बदलत नाही. मग भजन किंवा आरती यांना महत्व नाही का? .... महत्व आहे .... भजन किंवा आरती हे वैयाक्तिक साधनेला उभारणी देण्याचे काम करतात. याला English मध्ये Boosting किंवा Charging असे म्हणता येईल.

श्री. सिद्धेश धुमे यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे गेल्या चार भागात थोडेसे विषयांतर होऊन मूळ विषय बाजूला पडला. खरे तर हे विषय खूप विस्तीर्ण आहेत आणि त्यांच्या विस्तारात प्रत्येकाला रस असेलच असे नाही. अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि थोडक्यात आपण हे विषय Cover करण्याचा प्रयत्न केला. ज्यांना विस्तारपूर्वक Discussion करायचे आहे किंवा काही मते पटली नाहीत, ते कधीही ब्लॉगवर किंवा FB वर लिहू शकतात. मलाही माझे ज्ञान वृद्धिंगत करण्यास आवडेल.

जे विषयांतर झाले ते चांगल्यासाठीच असे मी मानतो. त्या योग्याचे काही अनुभव हे आत्तापर्यंत सादर केलेल्या लिखाणाला पुष्टी देणारे ठरतील असा माझा विश्वास आहे. आपल्यासमोर काही तरी GREAT किंवा भव्य दिव्य असे ठेवण्यासाठी हे अनुभव नाहीत. तसेच कुणाचा बडेजाव मांडण्यासाठीही नाहीत. जर कुणी अभ्यासू स्वतःच्या अनुभवाविषयी शंकीत झाला असेल किंवा विश्लेषण करू इच्छित असेल तर त्याला तुलना / विश्लेषण करणे सोपे जावे म्हणून हे लिहिले आहे हे कृपया लक्षात घ्यावे.


Let us start the diary of his Experience.

Tuesday, 1 April 2014

एका योग्याची डायरी - भाग ४

|| श्री स्वामी समर्थ ||


जे योगी, संत, स्वामी असे थोर सत्पुरुष इतिहासात होऊन गेले त्यांना एक व्यक्ती मानता मी शक्ती मानतो. जर शक्ती नष्ट होत नाही तर ते योगी नाहीसे झालेले नाहीत. ती शक्ती ते विशिष्ट शारीरिक रूप सोडून दुसऱ्या कुठल्या तरी शक्तीत रुपांतरीत (converted) झालेली आहे. ती याच वातावरणात अस्तित्वात आहे. आपण जर शोध घेतल्यावर ती शक्ती आपल्याला सापडू शकते.

आता याचा शोध कसा घ्यायचा ?

जसे साधक या शक्तीचा शोध घेतात तसेच या शक्ती देखील साधकांचा शोध घेत असतात. साधना जेंव्हा विशिष्ट पातळीवर पोहोचते तेंव्हा अशा शक्ती पोआप त्या साधकाशी संपर्क साधतात.  "जेंव्हा योग्य शिष्य तयार होतो तेंव्हा त्याला गुरु आपणहून प्राप्त होतो” हा गुरु शिष्य संबंधातील एक निसर्गनियम आहे.

जी साधना आपण सहजपणे करू शकतो ती आपल्याला केंव्हाही अनुकूल ठरते आणि म्हणूनच तीच साधना सुरु ठेवावी. ध्यान, धारणा हे काहीसे कठीण विषय आहेत. इथे मार्गदर्शनाची गरज भासते. चूक झाल्यास विपरीत परिणाम घडू शकतात. पण आरती, जप, भजन, नामःस्मरण यासारख्या सोप्या मार्गावर प्राथमिक अवस्थेत असताना थेट मार्गदर्शनाची गरज नसते. कोणताही चांगला शिक्षक (साधक नव्हे) आपल्याला यात मार्गदर्शन करू शकतो.

आपण प्रथम नामःस्मरण पाहू. यात कशी प्रगती किंवा अधोगती होते ते अभ्यासायचा प्रयत्न करू.
Energy never get destroyed. It can be converted from one source to another. The form is changed but energy always exists.

मग आजवर ज्यांनी नामस्मरण केले ते सारे या वातावरणातच असायला हवे. ते नष्ट होऊ शकत नाही. पण विखुरलेल्या स्वरूपात आहे. वातावरणात या कणांचे समुदाय अस्तित्वात असतात. जसे काही विशिष्ट देवळात गेले कि आपल्याला खूप मंगल, प्रसन्न वाटते. तर्कही विशिष्ट ठिकाणी आपल्याला अस्वस्थ वाटते. तिथे थांबवत नाही.

हे कण Positive (मंगल) आणि Negative (अमंगल) असे दोन्ही प्रकारचे असतात. माणसांच्या आचार आणि विचारांवर त्याच्याकडे आकर्षीत होणाऱ्या कणांचा प्रकार अवलंबून असतो. साधक जेंव्हा साधना करतो तेंव्हा हेच विखुरलेले कण (नामाचेज्ञानाचे) त्याच्याभोवती जमा होतात. या कणांचा समुदाय जसा जसा वाढू लागतो तसा तसा त्याच्या भोवतीच्या वातावरणात फरक पडू लागतोचांगल्या विचाराने प्रेरित लोकांभोवती Positive कण जमा होतात आणि कुविचाराने प्रेरित लोकांभोवती Negative.  सर्वसाधारण माणसे कोणत्या ना कोणत्या प्रभावाखाली दोन्ही प्रकारचे विचार करत असतात. त्यांच्या भोवतीचे वातावरण अशा दोन्ही प्रकारच्या कणांनी भारलेले असते.

योग्य प्रकारे साधना केल्यावर अंतर्शक्ती जागृत होते. मात्र त्या शक्तीला आपण ज्या आचार विचारांची जोड देऊ, तसे तिचे रूप असते. माणसांचे आचार विचार Constructive असतील तर Positive  कण जमा होत जातात. मात्र आचार विचार Destructive असतील तर Negative कणदेखील जमा होतात. जसे चुंबकाकडे लोखंडाचा कीस आकर्षीत होतो तसे हे कण साधकाकडे आकर्षीत होतात.


आता आरती, भजन यांचा विचार करू.



Sunday, 30 March 2014

एका योग्याची डायरी - भाग ३

|| श्री स्वामी समर्थ ||

आपण मागे पहिले की “आरती, जप, भजन, नामःस्मरण, ध्यान, धारणा अशी अनेक साधने आहेत. जे तुमच्या प्रकृतीशी जुळेल असे कोणतेही एक साधन निवडा.”

आता कोणते साधन माझ्या प्रकृतीशी जुळेल, याचा शोध कसा घ्यायचा?

यासाठी मी माझ्या प्रकृतीचा अभ्यास केला पाहिजे. मला सर्वप्रथम"मी" समजला पाहिजे. कोहम? या जगात सर्वांना सारे समजत असते. कोण कसा कुठे चुकतो हे सांगायला प्रत्येक जण तत्पर असतो. पण तरीही त्याचे स्वतःचे आयुष्य आनंदमय, समाधानी आणि शांत नसते. आलेल्या प्रत्येक भोगाला दोन उत्तरे आलटून पालटून सांगितली जातात.

. मी बरोबर केले होते. पण अमक्या तमक्यामुळे हे माझे चांगले होत नाही.
. मी इतके सगळे चांगले करतो तरीही माझे काही काही वाईट सतत होत असते. माझे नशीब दुसरे काय?

पण माझे काही चुकत असेल असा विचार कोणीच करत नाही. जो हा विचार आणि अभ्यास करतो त्याला निश्चित साधन शोधणे सोपे जाते. ज्याला हा अभ्यास करायचा नसतो तो कोणी तरी गुरु शोधत जातो आणि कुणाचे तरी पाय पकडून तो सांगेल ते करत राहतो.

साधनेच्या एखाद्या पातळीवर पोचलेला कोणीही गुरु होऊ शकतो का? तो आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करू शकतो का? याचे उत्तर त्याने आपल्याला कोणती साधना करायला सांगितली आणि त्या साधनेचा मला काय अनुभव आला यात शोधावे लागेल.

एखाद्या विशिष्ट साधनेवर प्रभुत्व असलेला फक्त त्या विशिष्ट साधनेचेच मार्गदर्शन करू शकतो. कारण त्याने फक्त त्या साधनेचाच अभ्यास केलेला असतो. सर्वांना तो तेच करायला सांगतो. ती साधना ज्यांच्या प्रकृतीशी जुळते त्यांना चांगले अनुभव येतात. बाकीचे आयुष्यभर वाट पाहत राहतात. आणि शेवटी नशिबाला दोष देतात. उदाहरणार्थ  : जसे एखादा रसायनशास्त्राचा पदवीधर असेल तर तो भौतिकशास्त्राचा मुलभूत (basic) अभ्यास सांगू शकेल, पण भौतिकशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम शिकवू शकणार नाही. तो सर्वांना सांगेल की रसायनशास्त्र घेऊन पदवी मिळेल. परिणामी ज्यांना रसायनशास्त्र अनुकूल नसेल, समजण्यास जड असेल ते सतत नापास होत जातील.

मग खरोखर गुरु या पदाला कसे ओळखावे?

जो सतत एकच प्रकारचे शिक्षण सरसकट सर्वांना देतो तो विशिष्ट पातळीवर पोहोचलेला साधक असतो. गुरु नव्हे तर शिक्षक असतो. शिक्षक फार तर सर्व साधनांची तोंड ओळख करून देऊ शकतो. गुरूला नेहमी माहिती असते की त्याचे स्वतःचे प्रभुत्व कशात आहे आणि तो शिष्याला ते शिक्षण अनुकूल आहे की नाही हे तो जाणत असतो. जर ते अनुकूल नसेल तर शिष्याला जिथे अनुकूल शिक्षण मिळेल अशा गुरूकडे पाठवतो.

आपल्याकडे सरसकट आणखीन एक शब्द वापरला जातो "सतगुरु किंवा सदगुरू" ! ज्याला सर्व साधनांविषयी खोलवर माहिती असते आणि त्याबाबत तो मार्गदर्शन करू शकतो त्यालाच सदगुरू म्हणावे. सर्वोच्च पातळीवर असतात ते योगी, संत, स्वामी! यांचे प्रभुत्व वादातीत असते. यांच्या शक्ती अमर्याद असतात आणि ते मुक्त हस्ते त्याची उधळण करत असतात. शरीर हे यांच्यासाठी निमित्त असते. शरीर सोडल्यावर देखील हे अस्तित्वात असतात आणि शिष्य घडवत असतात. हे कसे शक्य आहे?

यासाठी निसर्गाचा आणखी एक नियम अभ्यासू. कोणतीही शक्ती कधीही नष्ट होत नाही. फक्त ती स्वरूप बदलते. Energy never gets destroyed. It can be converted from one source to another. The form is changed but energy always exists.

जे योगी, संत, स्वामी असे थोर सत्पुरुष इतिहासात होऊन गेले त्यांना एक व्यक्ती मानता मी शक्ती मानतो. जर शक्ती नष्ट होत नाही तर ते योगी नाहीसे झालेले नाहीत. ती शक्ती ते विशिष्ट शारीरिक रूप सोडून दुसऱ्या कुठल्या तरी शक्तीत रुपांतरीत (converted) झालेली आहे. ती याच वातावरणात अस्तित्वात आहे. आपण जर शोध घेतल्यावर ती शक्ती आपल्याला सापडू शकते.

आता याचा शोध कसा घ्यायचा?



Saturday, 29 March 2014

एका योग्याची डायरी - भाग २

|| श्री स्वामी समर्थ ||

एका योग्याची डायरी - भाग १ वाचून, फेसबुकवर श्री. सिद्धेश धुमे याचं एक प्रश्न आला. “What does one need to do to be able to acknowledge and understand Indication?”

या प्रश्नाचे उत्तर वाटते तितके साधे सरळ नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात पुन्हा एक नवा प्रश्न उभा राहणार आणि प्रत्येक वेळी आलेले उत्तर पुन्हा नवीन प्रश्नाकडे नेणार. जर माझी आणि "त्या"ची Imagination, Illusion, Intuition आणि Indication  या ४ विषयांवरील चर्चा किंवा बोलणे लिहायचे ठरवले तर एक पुस्तक लिहावे लागेल.

तरीही मी थोडक्यात लिहायचा प्रयत्न करतो. या प्रश्नाचे सरळ उत्तर आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न पाहून एखाद्या निश्चित उपायापर्यंत पोहोचायचं प्रयत्न प्रयत्न करू या का? सरळ उत्तर द्यायचे तर ते असे असेल   …

“निसर्गाशी संपर्क, जवळीक आणि संवाद साधा !”

"पण निसर्ग म्हणजे काय? ... झाडे, आकाश, समुद्र, दगड-धोंडे, डोंगर, हवा, वातावरण?"

"नाही. प्रत्येक सजीव आणि निर्जीव अस्तित्व ... अगदी मोठ्या ताऱ्यापासून ते माणूस, पक्षी, जनावरे, विषाणू आणि अणू - रेणूसारखे छोटे छोटे कण .... एकत्रितपणे किंवा वेगवेगळे म्हणजेच निसर्ग होय."

“वर सांगितलेल्या सजीव आणि निर्जीव यांच्याशी संपर्क, जवळीक आणि संवाद कसा साधायचा?”

“निसर्गाशी सहजपणे वागा.””

“निसर्गाशी सहजपणे कसे वागायचे?”

“निसर्गात घडणाऱ्या कोणत्याही प्रसंगात/ घटनेत आपला सहभाग नोंदवू नका.”

"कशातही सहभागी व्हायचे नाही म्हणजे काहीही न करता स्वस्थ बसायचे का? मग जगायचे कसे?"

"सहभाग नोंदवू नका आणि कशातही सहभागी न होणे यात फरक आहे. सहभागी व्हा पण तो नोंदवू नका. हेच गीतेत सांगितले आहे. कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका."

“दैनंदिन व्यवहारात आपण पुष्कळ गोष्टींशी जोडलेले असतो. अशा वेळी स्वतःला कोणत्याही प्रसंगापासून / घटनेपासून वेगळे राखणे कसे शक्य आहे?”

“आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि नैसर्गिकपणे घडणाऱ्या कोणत्याही घटनेला विरोध करू नका. कोणत्याही नैसर्गिक प्रतिक्रियेवर पुन्हा क्रिया करू नका.”

“नैसर्गिक प्रतिक्रियेवर पुन्हा क्रिया करणे म्हणजे काय?”

"निसर्गाचे काही मुलभुत नियम आहेत. कोणत्याही वस्तूवर जोपर्यंत एखादे बाह्य बल (external force) काम (क्रिया) करत नाही तोपर्यंत त्या अस्तित्वाची स्थिती स्थिर असते. क्रिया घडली कि आपोआप प्रतिक्रिया घडते. प्रतिक्रिया ही नेहमी क्रियेच्या नेमक्या विरुद्ध दिशेने घडते आणि प्रतिक्रियेचा जोर/ शक्ती ही क्रियेच्या शक्ती इतकीच असते. म्हणजेच प्रतिक्रिया ही क्रियेमुळे निर्माण झालेली शक्ती किंवा घटना पुन्हा निसर्गात विसर्जित करते. नैसर्गिक घडलेली क्रिया नैसर्गिकपणे विसर्जित होऊ द्या. त्यात हस्तक्षेप करू नका.

घडत असलेली कोणतीही घटना ही क्रिया आहे की प्रतिक्रिया आहे, त्याची बल-शक्ती-दिशा काय आहे, याची माहिती नसताना केलेली कृती ही आपली चूक ठरू शकते. एक उदाहरण पाहू.

समजा निसर्ग एक तराजू आहे. एका पारड्यात कोणीतरी क्रिया केली. निसर्ग आपोआप दुसऱ्या पारड्यात प्रतिक्रिया ठेवतो. समजा मी असे समजलो की निसर्गाने प्रतिक्रियेसाठी माझी निवड केली आहे आणि क्रियेचे बल-शक्ती माहिती नसताना दुसऱ्या पारड्यात माझी प्रतिक्रिया ठेवली.

शक्यता १  - क्रियेची शक्ती १० किलो आहे. माझी प्रतिक्रिया १५ किलोची आहे. पारडे प्रतिक्रियेच्या बाजूने झुकते आणि निसर्गाला आता माझे जास्तीचे ५ किलो क्रिया म्हणून स्वीकारावे लागतात.

शक्यता २ -  क्रियेची शक्ती १० किलो आहे. माझी प्रतिक्रिया ५ किलोची आहे. पारडे क्रियेच्या बाजूने झुकलेले राहते आणि निसर्गाला ५ किलो प्रतिक्रिया करावी लागते.

शक्यता ३ (महत्वाची) - क्रियेची शक्ती १० किलो आहे. माझी प्रतिक्रिया १० किलोची आहे. मात्र निसर्गाने प्रतिक्रियेसाठी माझी निवड केलेली नाही. दुसरा कोणी येऊन त्या पारड्यात १० किलो ठेवतो. आता निसर्ग माझी प्रतिक्रिया ही क्रिया (हस्तक्षेप) म्हणून स्वीकारतो. मला १० किलोची प्रतिक्रिया घ्यावी लागते. म्हणजेच मी भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय हा माझे भोग वाढवणारा ठरू शकतो.

आपल्या भावना आपल्याला क्रिया आणि प्रतिक्रिया करायला भाग पडतात आणि निसर्ग ढवळला जातो. म्हणूनच निसर्गात हस्तक्षेप करू नका आणि भावनांवर नियंत्रण ठेवा.

“भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे?”

"मन शांत ठेवा."

“मन शांत कसे ठेवायचे?”

“विचार थांबवा. त्यांना सोडून द्या.”

“विचार ही एक सलग चालणारी प्रक्रिया आहे. ते कसे थांबवायचे? ”

“एकाच विचारावर मन केंद्रित करा. बाकीचे विचार आपोआप सुटतील.”

“एकाच विचारावर लक्ष कसे केंद्रित करायचे?”

“मन किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी अध्यात्मात आरती, जप, भजन, नामःस्मरण, ध्यान, धारणा अशी अनेक साधने आहेत. जे तुमच्या प्रकृतीशी जुळेल असे कोणतेही एक साधन निवडा. मनःशांती तुम्ही काय साधन निवडता यावर अवलंबून नसते. तर तुम्ही ती साधना कशी करता यावर अवलंबून असते. प्रत्येक साधनेला आपले स्वतःचे असे परिणाम असतात. मात्र विशिष्ठ प्रकारे आणि विशिष्ठ वेळ साधना केली तर ते परिणाम जलद गतीने अनुभवास येतात. अन्यथा फार कालावधी लोटावा लागतो किंवा काही जणांना कधीही परिणाम मिळत नाहीत."


मला वाटते आपण एका निश्चित उपायाकडे पोहोचलो आहोत. नाही का?


Wednesday, 26 March 2014

एका योग्याची डायरी - भाग १

|| श्री स्वामी समर्थ ||

अध्यात्म ... परात्पर  .... पारलौकिक  .... एक अधिभौतिक अनुभव ... एक आत्मानुभव ... म्हणजे नक्की काय? ... असले सगळे शब्द फार जड जड वाटायचे मला .... कुणी शब्द फोडून  शब्दार्थ सांगायचे ... थोडे हुशार भावना जोडून भावार्थ सांगायचे ... तर कोणी फार गंभीर चेहरा करून गुढार्थ सांगायचे ....

खरच ! देव, ईश्वर, परमेश्वर इतका अवघड, गहन आहे का? मग अनेक संत, महंत यांनी तो सोपा आहे असे सांगितले आहे ते का? काय असतात हे अध्यात्मिक अनुभव ? आपल्याला जे दिसते किंवा भासते ते सत्य कसे ओळखावे? प्रश्न ... प्रश्न .... आणि फक्त प्रश्न !

पाश्चात्य देशांमध्ये संशोधन होऊन ते आपल्यापर्यंत पोहोचले कि आपण ते स्वीकारतो. अन्यथा ते संशयाच्या भोवऱ्यात फिरवत ठेवतो. प्रत्येक संशोधन हे दस्तावेजांवर आधारीत असते. प्रत्येक दस्तावेज हा कसोटीवर घासून मगच सत्य समाजला जातो. आपल्याकडे फार पूर्वी अध्यात्माशी संबंधीत दस्तावेज केले जात. नंतर त्यात भावना मिसळून कुणाचा तरी उदो उदो केला जाऊ लागला आणि निखळ प्रामाणिक लेखन मागे पडले. आज आपण हे संशोधन पाश्चात्यांकडून येण्याची वाट पहावी का? आणि अशाच एका प्रश्नांकित क्षणी मला तो भेटला.

तुमच्या आमच्यातलाच ... त्याच्याशी बोलताना, विचारांची देवाणघेवाण करताना खूप काही लक्षात आले. त्याच्याच शब्दात सांगायचे तर अध्यात्मात खूप चकवे असतात. काही खरे .. काही खोटे ... भास, आभास आणि सत्य याचा विळखा सतत पडत असतो आणि यात सत्य ओळखणे कठीण बनते.

त्याने अनुभवांना चार कसोट्या लावल्या.

1. Imagination (creation by mind) - कल्पना
आपण एखाद्या गोष्टीचा फार विचार करतो. आणि ती गोष्ट मनाचा पगडा घेते. मनाला तेच चित्र समोर दिसू लागते. Just think of  something again & again .... after some time you will find that mind will show you similar things or images which you are thinking. This is not the truth. It's imagination of your mind. या साऱ्या आपल्या कल्पना असतात. 

2. Illusion - मतीभ्रम, मिथ्य
मन हे निरंतर विचार करत असतेहे विचार मनात  वेगवेगळे  भास निर्माण करत असतात.  ऐकीव 
माहितीच्या जोरावर किंवा imagination मुळे त्या आभासाच्या प्रतिमा मनावर आघात करतात आणि जे अनुभव येतात ते illusion. हे सारे आपले भ्रम असतात.

3. Intuition - अंतःप्रेरणा
Imagination आणि illusion  च्या पातळीच्या वर आलेले अनुभव .. यात घडणाऱ्या घटनांची चाहूल लागणे, भूतकाळातील घटना समजणे, समोरच्याविषयी आपोआप माहिती कळणे यासारख्या गोष्टी समाविष्ट असतात. पण कधी कधी भूतकाळातील समजलेली घटना ही भविष्यात घडणारी असू शकते. कधी भविष्यात दिसलेली घटना प्रत्यक्षात घडतच नाही. समोरच्याविषयी समजलेली माहिती ही अचूक असतेच असे नाही. म्हणजे हेदेखील सत्य असतेच असे नाहीपण बऱ्याच अंशी सत्याकडे झुकणारे असते.

4. Indication - संकेत, इशारा, लक्षण
ईश्वर हा निसर्गात सर्वत्र आहे हे सत्य असेल तर ईश्वराकडून येणारे संकेत हे निसर्गाकडून येतात असेही म्हणता येईल. हे थेट  निसर्गाकडून  येणारे संकेत हेच संपूर्णपणे सत्य असतात. निसर्ग सर्वांशी बोलतो. त्याचे ऐकणारा कोणी नसतो. ईश्वरी संकेत सर्वांकडे येतात. त्याकडे संपूर्ण लक्ष देणारे कोणी नसतात. Imagination, Illution आणि intution या साऱ्या पातळ्यांवर मन विचारात मग्न असते. त्यामुळे या संकेतांकडे आपले लक्ष नसते. सर्व साधारण पातळीवर हे संकेत जसेच्या तसे आपण उचलू शकत नाही.

एक उदाहरण पाहू.
आपण  रस्त्यावरून चालत असतोअसंख्य वाहने हॉर्न वाजवत जात असतातपण आपले लक्ष  आपल्या सोबत चालत बोलाणाऱ्याकडे असते किंवा आपण आपल्या विचारात दंग असतो आणि हे हॉर्न कानावर पडूनही आपल्याला ऐकू येत नाहीत. ते कानावर आपटले त्तरी त्याची नोंद आपले मन घेत नाही.

आणखी एक उदाहरण पाहू.
एखादी बाई गप्पा मारत बसलेली असते. तिचे मुल बाहेरून कुठून तरी हाक मारते. आवाज खूप दुरून आलेला असतो, बारीक असतो. पण आईला ती हाक पटकन ऐकू येते. बाकीच्या बायकांना किंवा पुरुषांना ती हाक कानावर पडूनही मनापर्यंत पोहोचत नाही. म्हणजेच मन एका विशिष्ठ दिशेने जोडलेले असले की तिथले आवाज चटकन नोंदले जातात

असेच संकेतांचे आणि अनुभवाचे असते. आपल्याला आलेले अनुभव हे Indication असतील तरच स्वीकारावे. ते तर्कांच्या कसोट्यांवर क्रूरपणे घासून पाहावे. आणि मगच Indication म्हणून स्वीकारावे


त्याने या कसोट्यांवर घासून स्वीकारलेले काही अनुभव हे इतरांना तुलनात्मक अभ्यास करणे सोपे जावे म्हणून लिहून ठेवले. तेच तुमच्यासमोर एक एक करून "एका योग्याची डायरी" द्वारे अर्पण करीत आहे .... त्याचे नाव वगळून ... कारण ... त्याच्याच शब्दात 

"ज्याला अनुभव आला तो महत्वाचा नाही तर जो अनुभव आला तो महत्वाचा” ...